Monday, 10 April 2023

शंभरीत पंच्चाहत्तरी

 भारतीय चित्रपटसृष्टीत मागील ७५  वर्षांत एवढा बदल झाला आहे की तो मोजक्या शब्दांत मांडणे कठीण आहे. यासोबतच हेही खरे आहे की, भारतीय  चित्रपट देशातील  प्रत्येक व्यक्तीच्या मनाला स्पर्श करतो, त्याच्या समस्यांपासून ते नातेसंबंध आणि यश-अपयश या सर्व गोष्टी चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. आता विदेशातही भारतीय चित्रपटांना एक खास ओळख  मिळत आहे. 

कॅनडा, जपान आणि चीनसारख्या देशांमध्ये भारतीय चित्रपटांची मोठी कमाई होत आहे. त्याचबरोबर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही भारतीय चित्रपटांचा बोलबाला आहे. मागील दिवसांत ‘आरआरआर’ ने केलेली  मोठी कमाल  जगाने अनुभवली आहे.

अनेक लेखकांनी स्वातंत्र्यानंतरच्या हिंदी चित्रपटांबद्दल बरेच काही सांगितले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांत हिंदी चित्रपटसृष्टीवर  नेहरूवादी  समाजवादाचा प्रभाव दिसून आला. 

तथापि, या काळात बनवलेले  काही महत्त्वाचे चित्रपट, जसे राज कपूरचा आवारा (१९५१), बिमल रॉयचा दो बिघा जमीन (१९५३), मेहबूब खानचा मदर इंडिया (१९५७) आणि गुरू दत्तचा प्यासा (१९५७) या चित्रपटांचे बारकाईने परीक्षण केल्यास हे स्पष्ट होते, की त्या काळातील हिंदी चित्रपट नेहमीच नेहरूंच्या भारताच्या दृष्टीकोनाशी सुसंगत नव्हते. हेही खरे आहे की, अंदाज, नया दौर, हावडा ब्रिज यांसारखे तत्कालिन  चित्रपट नेहरूंच्या आधुनिक भारताच्या आदर्शाचे, आधुनिकतेच्या चांगल्या बाजू चित्रित करण्यात यशस्वी ठरले. देशाचा विकास डॉक्टर, अभियंता आदींच्या पात्रांच्या माध्यमातून दाखवला जातो आणि जुगार खेळणाºयांची पात्रे आणि दृश्ये, कॅबरे डान्स इत्यादींच्या माध्यमातून वाईट बाजू दाखवली जाते.  या दोन्ही बाबी समाजावर खोलवर परिणामकारक ठरल्या आहेत.



याशिवाय  देशातील  चित्रपटनिर्मितीवर काही महत्त्वाच्या घटनांचाही परिणाम झाला. भारत-चीन युद्धातील वेदनादायक सत्यता, १९६०च्या दशकातील हरित क्रांती, आणीबाणी  आदी ऐतिहासिक घटनांना हिंदी चित्रपटसृष्टी चुकली नाही. यानंतरच्या काळातील वाढलेली   लोकसंख्या आणि बेरोजगारी हा मुद्दा सुद्धा चित्रपटांत दिसून आला. १९८० च्या दशकात खलिस्तान चळवळीचा प्रभाव सुद्धा पाहावयास मिळाला. नव्वदच्या दशकापासून मात्र चित्रपटक्षेत्राच्या व्यापारीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे पाहायला मिळते. पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी जागतिकीकरणासह आर्थिक उदारीकरणाच्या नव्या युगाची सुरुवात केली. ही बाब चित्रपटक्षेत्रालाही लागू झाली.

मिस्टर इंडिया, तेजाब, कयामत से कयामत तक, मैने प्यार किया,  खिलाडी यासारख्या चित्रपटांच्या व्यावसायिक दृष्टीकोनाने हिंदी  चित्रपटसृष्टी  अधिक मजबूत झाली. २१व्या शतकाच्या  वळणावर   प्रामुख्याने  गुन्हेगारी पात्रे आणि  समाजाची  काळी  बाजू  दाखवण्यात आली होती. तर, २००० सालानंतर चित्रपटांनी नवे रूप स्वीकारल्याचे आपणांस दिसून आले. पुढील दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शर्यत सुरू झाली आणि त्यावरच हिंदी चित्रपटाचे यश अवलंबून दिसून आले.

आज  हिंदी  चित्रपटांचा प्रवास वेब आणि ओटीटी प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचला आहे. यातून चित्रपट निर्मात्यांना प्रेक्षकांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या  वेबसिरीज आणि चित्रपटांची निर्मिती करावी लागत आहे. कोरोना महामारीच्या काळाने तर प्लॅटफॉर्मला आणखी चालना दिली आहे. चित्रपटगृहे अनिश्चित काळासाठी बंद झाल्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन येथूनच होऊ लागले. अनेक वर्षे  चित्रपटाचा पडदा गरीब टेलिव्हिजनला हसत होता़ आता ओटीटीने रुपेरी पडद्याला मात्र जोरदार टक्कर दिल्याचे म्हणता येईल.


@ sanjay mundalkar

Wednesday, 5 April 2023

लहान थोर भारतीयाच्या अंगावर मूठभर मांस चढण्यासारखे ... भारताने आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत प्रत्येक क्षेत्रात अगणित कामगिरी केली आहे. समाजजीवन असो वा अर्थव्यवस्था, शिक्षण असो वा आरोग्य, पृथ्वी, जल असो वा आकाश असो, संरक्षण क्षेत्र असो, सर्वत्र भारताचा तिरंगा फडकवला गेला आहे.

 भारताने आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत  प्रत्येक क्षेत्रात अगणित कामगिरी केली आहे. समाजजीवन असो वा अर्थव्यवस्था, शिक्षण असो वा आरोग्य, पृथ्वी, जल असो वा आकाश असो, संरक्षण क्षेत्र असो, सर्वत्र भारताचा तिरंगा फडकवला गेला आहे. 






देशाच्या विकासाच्या प्रवासात काही गोष्टी मैलाचे दगड ठरल्या आहेत, कृषी क्षेत्रापासून, आण्विक आणि अवकाश तंत्रज्ञानापर्यंत, सामान्य माणसाला उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवांपासून, जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांपर्यंत, वैद्यकीय शास्त्रापासून आयुर्वेदापर्यंत आणि उपचाराच्या विविध पद्धती, जैवतंत्रज्ञानापासून, जगात सक्षम आयटीपर्यंत. पॉवरहाऊस म्हणून, जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम तयार करण्यासाठी जगातील सर्वात वेगाने वाढणाºया प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याने, भारताने मोठा बदल पाहिला आहे. आपली लोकशाही राज्यघटनेवर आधारित आहे़ याच कारणामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण जागतिक स्तरावर नावलौकिक  निर्माण केला आहे. स्वातंत्र्यानंतर देशाच्या पुनर्विकासात एकापाठोपाठ एक अनेक पंचवार्षिक योजना आल्या आणि या योजनांनी महत्त्वाचा पाया म्हणून काम केले आहे. आजपर्यंत देशात जितक्या वेळा लोकसभा निवडणूक झाल्या, तितक्या वेळा देशातील लोकशाहीही मजबूत झाली आहे आणि विविध आव्हानांना तोंड द्यायलाही ती शिकली आहे. 

 हरितक्रांतीमुळे देशातील तृणधान्यांच्या उत्पादनात (विशेषत: गहू आणि धानाच्या उत्पादनात) अभूतपूर्व वाढ झाली. आज भारताकडे धान्याचा अतिरिक्त साठा आहे, जो स्वत:च्या गरजा पूर्ण करतो तसेच मित्र आणि गरजू देशांना मदत करतो. अंतराळ क्षेत्रात भारताच्या प्रवेशामागे डॉ. विक्रम साराभाई यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञाची ऊर्जा आणि क्षमता होती. इस्रोच्या स्थापनेचा उद्देश अंतराळ विकासाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास तसेच अवकाश विज्ञान आणि ग्रह संशोधनातील संशोधन तसेच राष्ट्राच्या विकासासाठी होता. भारत आता चंद्र आणि मंगळ मोहिमांवर लक्ष केंद्रित करत आहे. याशिवाय दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात भारताला जमिनीपासून आकाशापर्यंत नेणारा हा जगातील सर्वात मोठा दुग्धविकास कार्यक्रम होता. 

भारताने १८ मे  १९७४ रोजी पोखरण येथे पहिली अणुचाचणी करून आपल्या क्षमतेची ओळख जगाला करून दिली होती. २४ वर्षांनंतर ११ आणि १३  मे १९९८ रोजी एकामागून एक अशा पाच अणुचाचण्या घेतल्या. भारत आजच्या घडीला प्रत्येक  क्षेत्रात स्वयंपूर्ण झाला आहे़ अन्नधान्य उत्पादन, माहिती  तंत्रज्ञान, दूरसंचार, आरोग्य, संरक्षण, दळणवळण, अंतराळ संशोधन यासारख्या  प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळविले.

मागील ७५ वर्षांत अनेक राजकीय पक्षांची सरकारे आली; परंतु विकासाचा, संपन्नतेचा प्रवाह अखंड राहिला़ जगातील सर्वांत मोठी लोकसंख्या आणि सर्वांत मोठी लोकशाही प्रणालीचा मान भारताला मिळाला आहे आणि तो मान फक्त आणि फक्त भारतच सांभाळू शकतो.

दोन वर्षांअगोदर कोरोना महामारीच्या काळात भारताने अमेरिकासह लहान मोठ्या देशांना औषधींचा पुरवठा केला़ तर, नंतरच्या काळात युद्धस्तरावर कोरोना प्रतिबंधक लसींचे संशोधन आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करून संपूर्ण देशाचे लसीकरण करवून आणले़ ही जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम होती़ त्याचवेळी भारताने आपली गरज भागवून अन्य देशांना ही लस उपलब्ध करून दिली़ शिवाय ‘प्रथम शेजारी’ ही संवेदनात्मक भूमिकाही मोठ्या  बंधुच्या रूपात पार  पाडली. भारताच्या आजपर्यंत प्रत्येक सकारात्मक भूमिकांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे कौतुक झाले आहे, हेही लहान थोर भारतीयाच्या अंगावर मूठभर मांस  चढण्यासारखे आहे, असे आम्ही मानतो.

संजय मुंदलकर

सर्वाधिकार सुरक्षित

Friday, 24 March 2023

NAVANTIKA ... SANJAY MUNDALKAR STORY त्या धाग्यातील तू सुद्धा एक, मग कुणावर प्रेम करणं हा गुन्हा कसा ठरावा आणि कुणी ठरवावा? भाग ३

त्याला आणि तुलाही मी प्रत्यक्ष बघितलं नाही़  कुठल्या दिव्यदृष्टीनं बघतो तुला, अनुभवतो तुझं अस्तित्व? कां करतोय ओढल्या जातोय मी तुझ्याकडं? माझ्या प्रेमात आसक्ती आहे. वासना नक्कीच नाही़  निर्व्याज्य प्रेम करतोय मी तुझ्यावर आणि त्यासाठी कुठलाही त्याग करायची तयारी माझी! 


file photo


‘‘हा सगळा खेळ तुच खेळलास़ स्वार्थाचा  गोचिड अजूनही पोसतेस आपल्या मनावर! आणि हे जे तू, माझं वन केलं...माझं वन केलं म्हणून आव आणतेस ना, सब नाटक है...सब्ब नाटक!  आपल्या पोटच्या पोराचं स्वत:पेक्षा हजारपटीनं नुकसान केलंस़  नाकारणार हे सर्व ? आणि कसं? कुठला पुरावा आहे. अगं, समाजाचं सोड... तू आपल्या अंर्तमनाला तरी पुरावा देऊ शकतेस का?’’


नित्या केवळ हुंदके देत होती. निर्भय शब्दांच्या अस्त्र-शस्त्रांनी अगदी तुटून पडला.


‘‘ज्या वयात त्याला आई हवी होती, त्यावेळी कुणाच्या तरी संसारात मग्न होतीस़.. स्वार्थात मग्न होतीस ... स्पष्ट सांगायचं तर वासनेत तुडुंब होतीस. हे सर्व स्वीकारलसं आणि त्या लहानग्याचं मन धिक्कारलं? हेही तुला माहिती होतं, की त्याला वडील नाहीत आणि तू दहा-अकरा वर्षांच्या चिमुकल्यास आपल्या नणंदेच्या पदराआड लपवलं!’’


‘‘हो हो ... मी चुकलेचं...त्यावेळी परिस्थितीच तशी होती; पण मी हे सर्व वासनेसाठी केलं नाही. मी खोटं बोलत नाही. माझ्या घरातील लोकांनीच ही परिस्थिती जाणीवपूर्वक ढकलली माझ्यावर.’’


‘‘खोटं, साफ खोटं ... परिस्थिती तशी नव्हती, तर तसं ढोंग केलसं तू. काय होतं वय त्याचं आणि कोणती समज होती त्याला! आपली आई दुसºया कुण्या पप्पाजवळ राहायला गेली, हे त्यानं स्वीकारलं, असं समजतेस का तू? किती उन्हाळे-पावसाळे झेलले होते त्यानं? तुझ्यापासून दूर झाल्यानं त्याच्या मनावर जे काही ओरखडे पडले, ते नक्कीच पुसले जाणार नाहीत़, कदापिही नाही. ते व्रण आजन्म पुरेल त्याला.’’



नित्या काय बोलणार आणि कसं! सत्यता नाकारू शकणार नव्हतीच. आयुष्य आणखी एक वळण घेऊ पाहत होती. आपल्यावर आत्यंतिक प्रेम करणारा हा माणूस कुठून आणि कसा आपल्या आयुष्यात आला, हे आकलनही तिला होईना.


‘‘नित्या, माझा निरजवर तेवढा अधिकार नाही, जितका तुझा आहे.तुझ्या उदरातून जन्म घेतलायं त्यानं. त्याची नाळ तुझ्याशी अधिक जुळलीयं. मी खूप पे्रम करतोय त्याच्यावर आणि तुझ्यावरही आणि हे सर्व जाणतेस, अनुभवतेस तू़. त्याला आणि तुलाही मी प्रत्यक्ष बघितलं नाही़  मात्र, कुठल्या तरी दिव्यदृष्टीनं बघतो तुला, अनुभवतो तुझं अस्तित्व़ कां ओढल्या जातोय मी तुझ्याकडं? प्रेमात आसक्ती आहे. वासना नक्कीच नाही़  निर्व्याज्य प्रेम करतोय मी तुझ्यावर आणि त्यासाठी कुठलाही त्याग करायची तयारी माझी! कुठल्या बंधनांनं एकत्र आणलंय आपल्याला. कुठल्या परिस्थितीनं जुळलोयं तुझ्याशी? नियतीनं आणखी कुणी नाही आणि तुलाच कसं माझ्या आयुष्यात आणलं, तेही अशा स्थितीत की जिथं वाटा तर दिसताहेत; पण चालता येत नाही...

file photo


नित्या स्तब्ध ऐकत होती.


‘‘प्रेमव्यासंगी मानव आहे मी़  तुझ्यासारख्या विवाहितेवर प्रेम जडले.  काय चूक त्यात? मी चोर नाही़  कुणाचं घर फोडलं नाही, कुणाला लुटलं नाही, ‘ओटीपी’ मागून फसवणूक केली नाही. मी कदाचित पत्रकार म्हणून समाजाप्रति अधिक संवेदनशिल आहे, हे नक्कीच़ कारण मी समाजाचा अभ्यास करतो, त्याला अनुभवतो़ लोकांच्या अडचणीतून माना काढतोयं़ रस्त्यांवर संताप पाहतोय़ हाता-तोंडाशी मोठ्या कठीण परिस्थितीत गाठ भेट होणारी माणसं पाहतोय़अशा लोकांवर प्रेम करणं मी का नाकारावं? आणि  त्या धाग्यातील तू सुद्धा एक. कुणावर प्रेम करणं हा गुन्हा कसा ठरावा आणि कुणी ठरवावा?’’


‘‘...याबाबत मला काहीही सांगता येणार नाही; पण मी त्यांच्या घरात गुदमरतेयं इतकंच मला सांगायचं... तिथं नाही राहू शकणार मी! माझ्या आणि माझ्या बाळाच्या आयुष्याला दिशा देणार ते तुम्हीच, इतकंच बोलू शकते.’’ नित्या  बोलली.

file photo


नक्कीच नात्यांमध्ये वेगवेगळी वळणं येऊ लागली होती. निर्भय आता नित्या आणि निरजमध्ये पूर्णपणे गुंतला होता. या प्रसंगापासून निशा आणि निहारिका अजाण असल्या तरी नित्या, निर्भयच्या त्यांच्याशी असलेल्या नात्याबाबत अवगत होती़  निर्भय एका मुलीचा बाप आहे, ही जाणीव सुद्धा तिला होती. दोन बाजू निर्भयपर्यंत पोहोचत होत्या़  त्यांच्यात त्रिकोण नव्हता, हे ही सत्य होतं; परंतु त्या पाचजणांचं भविष्य कसं असेल, हे आजच्या घडीला कुणालाही सांगता येणं शक्य नव्हतं, अगदी नियतीला सुद्धा नाही...





 


 लेखक :        संजय मुंदलकर 
 कथा :           नवंतिका
              जिथं प्रेम हाच देव्हारा ...

                    (सर्वाधिकार सुरक्षित)
                     ही कथा सलग नाही
                     छायाचित्र प्रतिकात्मक  
                    [ all rights reserved] 

Tuesday, 7 March 2023

KATHA महादेव म्हणाला, आता म्हायी लाज तुया हातात...




महादेवनं शेवटचा विळा पाजवला आणि काणसेनं त्याला धार लावली़ विळे मोजून एका सुतळीनं बांधून ठेवले़ रामराव धनगरानं पाच विळे बनवायला दिले होते़ निंदाई सुरू झालेली़ महादेवला पाच नव्या कोºया विळ्यांची ‘आॅर्डर’ मिळाली़ एकाच वेळी मोठी रक्कम हातात येणार होती़ मग त्यानं भट्टीतले कोळसे बाहेर ओढून  विझविले़ हातोडा, छन्नी, काणस, घण, डहान, लहान ऐरण, सांडशी असे अवजारे जागच्या जागी ठेवले़ दुकानाची झाडलोट केली़ कवाडीजवळ उभं राहून बाहेर नजर टाकली़ गाव सामसुम होते़ बसस्टँडवर काहीजण नजरेत आले़ एकटे दुकटे पानठेल्याशी उभे होते़ काही म्हाताºयाकोताºयांच्या बीडी-तंबाखूच्या संगतीत गप्पा सुरू होत्या़ 


एवढ्यात बाभुळगांवकडून एसटी बस गच्चकन येऊन थांबली़ गाडीत गर्दी नव्हती़ तुकाराम बारश्याचा मन्या, रामराव वठ्ठ्याचा दिन्या अन् शेजारच्या गावातली दोन-चार लोक उतरले होते. कंडक्टरनं घंटी मारली अन् एसटी पुन्हा नेरकडं निघाली.

इकडं नांदीजवळ महादेवनं हातपाय धुतले़ सपरीतल्या विटांवरून उडी मारत तो आतल्या खोलीत आला़ सपरीतल्या मातीचे पोपडे निघाले होते़ अजूनी ती कोरडी झाली नव्हती़ दुपारचा बरोबर एक वाजला होता़ त्यानं ग्लास आणि गडवा भरून घेतला़ दवडीतली दीड भाकर ताटात मोडून घेतली़ वाटीत भाजीच्या गंजातून फोडणीचं वरण घेतलं़ बरणीतलं रायतं घेवून जेवण उरकवलं़ शेल्याला हात पुसत तो घराबाहेर आला़ भरदुपारी अंगणात अंधार पडल्याचं दिसलं तसं त्याचं ध्यान वर गेलं़ थोड्यावेळापूर्वी चकाचक असलल्या आकाशात एकदम ढगांची रेटारेटी सुरू होती़ त्याच्या छातीत धस्स झालं़ 

‘ अरे देवा! आता हा चांगलास्स रिचवते़ पुन्ना सपरीत गाटा व्हईऩ देवबी म्हायी मोठी परीक्षाचं घेवून राह्यला माही अन् हा आबाबी कुठी गेला कोन जाणे ?’ असं स्वत:शीच बोलत तो तुºहाट्या-पºहाट्याच्या ढिगाकडे गेला़ 

‘दोन दिस चांगली उघाड पड्ली़ सपरीबी सोेकली व्हती़ आज पानी रिचवला तं कायी खरं नायी़’ असं पुटपुटत त्यानं हातातल्या विळ्यानं पºहाट्या उकरल्या़

इतक्यात थंड वारा सुरू झाला़ दोन-चार थेंबही पडू लागले़ महादेवनं पºहाट्याचा कवटा दुकानातल्या भात्याजवळ आणून ठेवला़ आता हवेचा वेगही वाढला़ धावत जात तुराट्याचा  दुसरा कवटा पहिल्याच्या बाजूला ठेवला़थेंब वाढत गेले़ हलकासा पाऊसही सुरू झाला़ अंगणातल्या कवाडीजवळ येत त्यानं आबाला हाक दिली़‘‘आबा, ओ आबा़’’ तेवढ्यात तुकाराम कुंभाराचा सुध्या येताना दिसला़ महादेवनं मग त्यालाच विचारलं,‘‘अरे सुध्या, म्हां आबा दिसला का ईस्टँडवर?’’

‘‘नायी गा काका़’’

‘‘़़़अन् तुया डवºयाले काय झालं?’’

‘‘अगा, दांडी तुटली़ म्हटलं रामकिस्ना मामाकडं नेतो लौकऱ’’

‘‘बरं बरं जा लौकऱ अभाय तं चांगलस्स भरून आलं़’’

त्यानं पºहाट्याचे चार कवटे दुकान आणि गायीच्या कोठ्यात आणून ठेवले़ कारण की पावसाचा काही भरवसा नव्हता़ कधी, कसा आणि किती दिवस रिचवण काही सांगता येत नव्हतं़ तेवढ्यात महादेवचा बाप आबा काठी टेकवत टेकवत आला़ 

‘‘कुठी गेला होतास्स गां?’’ महादेवनं शेल्यानं डोक्यावरचे केस पुसत विचारलं़

‘‘अरे थ्या सखाराम शिप्याच्या घरून मेनकापड आनला़ सपरीवर हातरून देवू, थोडकश्यानं तरी पानी थांबलं़’’ दुकानातल्या बाजीवर बूड टेकवत आबा उत्तरला़

‘‘हो, पन तेवढ्यानं भागनार नायी़ पान्याच्या माºयानं पानी गयनचं़ मातर अवंदाचं वर्स निभवास्स लागऩ नशिबानं हे दिस दाखोले तं भोगालेस्स पाह्यजे़’’

पावसाचे थेंब कमी झाले तसा महादेव म्हणाला, ‘‘मी गायीसाठी दोन-चार पेंड्या चारा घिवून येतो़ पानी आलंस्स तं जरा ध्यान ठिवजो़ दुपारच्या सुट्टीत पोट्टेबी येईन जेवाले़ पाह्यजो त्यायच्याकडं, जेवतानी नुसते भांडते लेकाचे़’’

मग आपल्या हातचा विळा घेवून महादेव रस्त्याला लागला़ घराजवळ खारीतल्या पायवाटेने तो पांदणीत आला़ वावरावावरात निंदणी, डवरणीचं काम सुरू होतं़ पºहाटी वितभर वाढलेली तर तुरीच्या झाडांनीही उभारी धरली होती़ नजर पोहोचेपर्यंतचा सगळा शिवार हिरवागार दिसत होता़ मजुरांचे हात जोरात चालत होते़ बायकांचा कोलाहल कानावर आदळत होता़ दुसरीकडे डोक्यावरील आभाळात ढगांची गर्दी होती़ महादेवनं पावलांचा वेग वाढवला़ गवताच्या दोन-चार पेंड्या घेवून घर गाठणं गरजेचं होतं़ मात्र, सध्या तरी देवाचा पाऊस त्याच्या आयुष्यावर उठला होता, निदान त्याला तसा भास झाला होता़ आणि त्याचं कारणही तसंच होतं़़़


़़़महादेवच्या पोटी तीन पोरं होती़ मोठा विशाल, मधला प्रशांत त्यानंतर संदीप़ बायको पार्वती आणि बाप आबा असा त्याचा परिवार होता़ तो आपल्या आईवडलांना एकुलताच होता़ लाडाचा असल्याने मायबापानं कुठंही पाठवलं नाही़ केवळ गावातल्याच शाळेत तो शिकला़ मात्र, त्याच्या मनात शिक्षणाचं आकर्षण होतं़ आपण शिकलो तर नाही़, मुलांना तरी आपण खूप शिकवू, असा त्याने निर्धार केला होता़ आणि तो तडीसही नेला़ विशाल अकोल्यातून आपल्या परिवारासाठी आनंदाची बातमी  घेवून आला़ त्याला  बी. एड.साठी प्रवेश मिळणार होता; पण डोनेशनची गोष्ट ऐकून महादेवचा हिरमोड झाला़ मात्र, दुसºयाच क्षणी तो मनातून ताठ उभा राहिला़ कुठल्याही परिस्थितीत पोरांसाठी पैसे उभे करण्याचा निश्चय केला.

‘‘ह्ये सरकार गरिबाच्या लेकराले शिकूस्स देत न्हायी़ शिरीमंताकून घ्या म्हनावं लागनं तितके पैसे़ गरिबाच्या घरात तरी उजेड पडू द्याचा का न्हायी़’’ आबानं नातवाची तगमग ऐकून म्हटलं़

‘‘तसं नाही आबा़ सरकार नाही,संस्थावाले इतके पैसे घेते़’’ विशाल म्हणाला़

‘‘अरे पन, सरकारनं कायी कराले पाह्यजे का न्हायी?’’ आबाला विशालचं मत पटलेलं नव्हतं़

तेव्हा विशाल काहीशा नाराजीनेच महादेवला म्हणाला,‘‘बाबा, राहू द्या़ पुढल्या वर्षी कुठंतरी अ‍ॅडमिशन मिळेलच़तेव्हा पाहू...’’

तसा महादेव लागलीच म्हणाला,‘‘नायी पोरा़ म्होरल्या वर्सी नाही़ यंदाच!आतातोवरक तू एकेक सालं जपलं़ हे साल वाया जावू नोको देवू़ मी कायीतरी येवस्था करतो़ तू कायजी करू नोको़ कवा पाह्यजे थे सांग म्हंजीन मी कामाले लागतो़ फकस्त इतकं ध्यानात ठेव का तुया मांग दोघं भाऊ हायीती़ ’’

‘‘अजून पंधरा दिवस वेळ आहे़’’

‘‘बस्स तं मंग़ उद्यापासून काम सुरू़’’

‘‘़़़पण बाबा, रक्कम मोठी आहेक़ुठून जमवणार हे सर्व?’’

‘‘पोरा, रक्ताचे नसले तरी जीवाले जीव देणारे काका, मामा  हायीत  तुये़ लावतील हातभार थोडा थोडा़ कमी पडले तं लोखंड  टाकू  ईकूऩ तू त्याची चिंता नोको करू़ मी पाह्यतो काय कराचं तं़’’ महादेव विश्वासानं म्हणाला़


विशाल अभ्यासात हुशार होता़ त्याला शिक्षक व्हायचं होतं़ म्हणून त्यानं बी. एड़ साठी अर्ज टाकला़ मोठा मास्तर झाला तर लहान पोरंही मार्गी लागतील, असा महादेवचा होरा होता़ घरी तर शेतीवाडी नव्हती़ खातकाम करून तो आपल्या परिवाराच्या चार घास कमावण्याइतकी कमाई करत होता़ पार्वती शेतमजूरी करून संसाराला हातभार लावायची़ घरात शिल्लक असा पैसा नव्हताच़ तरीही महादेवनं हिंमत हारली नाही़ छातीला माती लावत पोराला कोणत्याही परिस्थितीत मास्तर बनवायचाच, असा चंग बांधला होता़ मात्र, त्यासाठी पन्नास हजाराची सोय करावी लागणार होती़ नशीब म्हणून थोडी फार सवलत मिळाली होती़ संबंधित संस्थेला  दिवाळीपर्यंत एकूण रक्कम देणे गरजेचे होते़


त्या रात्री जेवणखाणं झाल्यानंतर महादेवनं पार्वतीला सांगितलं,‘‘अवं, मी काय म्हनतो़ सकायी ईशालले पातूरच्या बाईकडं पाठोलं तं...’’

त्यावर पार्वती काही बोलली नाही. तेव्हा महादेवनंच आपलं बोलण रेटलं,‘‘तिचीबी शेतवाडी हाये़ निंदण,डवरणं सुरू हाये़ तरीबी जवायानं थोडा जोर लावला तं काम व्हईऩ’’

‘‘अवं पर बाईलेबी कसं म्हनावं़ ज्याच्या त्याच्या घरी निंदाई, डवºयाचं काम हाये़ मातर बाईवर ईस्वास हाये़ तुमची दूरची चुलत बईन असली म्हून काय झालं, तिनं आपल्याले टायमाटायमाले मदत केलीस्स हाये़’’  पार्वती म्हणाली़

‘‘़़़मले वाट्टे बाई पाचक हजार तं देईनस्स़’’ महादेवनं आपला विश्वास बोलून दाखविला़

‘‘अवं तं बाकीच्या पैशांचं काय?’’

‘‘व्हयं, त्याचाच ईचार हाये आता़’’

‘‘मोरगांवचा सुदाम भाऊ, दिसपूरचा नामा तात्या अन् कारंज्याचा देवराव हेस्स लोक कायी तरी देईऩ बाकी, गावातल्या आण्याजी अन् तुक्या दादाकडंबी सबद टाकून पाहू... ’’

‘‘़़़तरीबी कमी पडले तं?’’

‘‘अवं लोखंड हाये़ गाय हाये़ बोद्या हाये़ अशावक्ती मानसापरीस जनावरंच कामी येत्यात़ ईकून टाकू लेकाले़ तरीबी नायी जमलं तं सपरीवरच्या टिना ईकू़पर ईशाल मास्तर झालास्स पाह्यजे़’’

‘‘अवं पर पावसायाचे दिस हाये़ टिना ईकल्या तं तिथं टाकणार काय? मेनकापड टिकत नायी़’’

‘‘अवो, तट्टे टाकू तुराट्याचे़ दोन घरी हायीत़ अनखी दोनक दुसºया कोनाले मांगू़’’ महादेवचा बेत तयार होता़

‘‘़़़पर सपरीवर तट्टे टाकले तरी थेबी गयनारचं का नायी़ नुसता गाटा व्हईऩ’’

‘‘मेनकापड हाथरू़़क़ायी नायी व्हतं़़़झोप आता़’’


महादेवनं आपल्याबरोबर पार्वतीलाही निश्चिंत केलं़ त्याच्या प्लॅननुसार हाती पैसे पडत गेले़ गावातल्याच सदाशिव पाठरेला एक गाय आणि बोद्या नावाचा गोºहा विकला़ तरीही अर्धी रक्कम जुळत नव्हती, तेव्हा त्यानं चांगले जाडेभरडे सहा टिन गावातल्या दौलत पटवाºयाला विकले़ भर पावसाळ्यात आपल्या पोराच्या शिक्षणासाठी डोक्यावरचं छप्पर विकणारा महादेव एक अवलियाच होता़ पार्वतीच्या डोळ्यांतून मात्र आसवाची रांग लागली़ लहान पोरांना काही कळत नव्हतं़ आपला मोठा भाऊ मास्तर होतोय, एवढंच त्यांच्या ध्यानी येत होतं़ त्याच दिवशी महादेवंन सपरीवर तुराट्याचे पाच तट्टे चढविले़ आणि वरच्या वर वरच्या देवाला हात जोडत म्हणाला,‘‘देवा,आता म्हायी लाज तुया हातात हाये़ एवढं मी पोरासाठी करतो़ त्याले लौकर मास्तर बनवं अन् माह्या घरावर पुन्ना असेच टिनं बसू दे़’’


दहा-बारा दिवस कसे निघून गेले, महादेवच्या ध्यानातही आलं नाही़ दुसºया दिवशी त्यानं विशालच्या हाती पंचवीस हजार ठेवले़ आणि म्हणाला,‘‘पोरा, मीनं पैसे कसे जमवले, हे तूबी पाह्यलंस्स़ बस्स! तेवढं ध्यानात ठेव़ आमी पान्यातबी दिवस काढू़ तू आपल्याकडं लक्ष दे़ कायी कायजी करू नोको़ बाकीच्या पैशाची दिवायीतवरक येवस्था व्हईनस्स़ लौकर मास्तर होवून आपल्या भावालेबी पुढं ने़’’ बोलता बोलता त्याला हुंदका आला. पार्वतीनं त्याला ओवाळलं. विशाल आपल्या मायबापाच्या आणि आजोबाच्या पायी पडून अकोल्यात गेला़


तिथून दोन दिवसांतच पावसानं ठाण मांडलं़ महादेवच्या घरातल्या सपरीवरच्या तट्टयातून पाणी गळालं़ जागोजागी धारा लागल्या़ परिवारानं असं दिवस बघितले नव्हते़ कोरडीठण्ण असलेली सपरी ओलीगच्च झाली़ सुरुवातीला धारेखाली गंज,टोपले,लहान मोठे  कटोरे ठेवले; पण त्या तट्ट्याच्या प्रत्येक छिद्राखाली भांडी ठेवणार किती आणि कुठवर? महादेव,आबा, पार्वती आंजोळीनं साचलेलं पाणी बाहेर फेकत होती़ आणि दोन पोरांच्या लहानश्या आंजोळींनीही हातभार लावला़ हे दृष्य गावकरी बघायचे़ तेव्हा  थांबून हळहळ व्यक्त करीत़ ‘पोराले शिकवाले घरावरचे टिन ईकून टाकल्या अन् पान्यात राहून राह्यले माय’,‘कसं केलं माय ह्या माहादेवनं़ घरावरच्या टिना कायले ईकल्या अन् आता पान्यात राह्यते़’,‘ पोरगं मास्तर झाल्यावर त्यानं घराकडं लक्ष नायी देल्लं तं़ एवढा कसा काय माहादेवनं पोरावर ईस्वास टाकला़’ ‘मी म्हनतो घरावरचे टिन ईकून पोराले शिकवाची कायी गरजस्स नोती़’असं काहीबाही कानावर आल्याने पार्वतीला वाईट वाटायचं़ तिचं घर बसस्थानकाशेजारीच असल्याने प्रत्येकाचं लक्ष जायचं़ प्रारंभी आभाळातील पावसाबरोबर पार्वतीच्या डोळ्यांतून आसवे गळायची़ नंतर मात्र आभाळच एकटं ओतायचं. एकदा तर सपरीत फूटभर पाणी साचलं़तेव्हा महादेवनं दारवाज्याच्या चौकटीखालून बाहेर दांड काढला़ मात्र, अंगणातीलच पाणी अंदर यायला लागलं़ तेव्हा त्या दोघांनी आंजोळीनं टोपल्यात पाणी जमा केलं आणि बाहेर फेकलं़ 


एकदा आबाला मोठ्या नातवानं विचारलं,‘‘ का गा आबा, झड लागली तं  कसं व्हईन?’’ तेव्हा आबा त्याच्या केसावर हात फिरवत म्हणाला, ‘‘अरे कायी नायी व्हतं़ दसºयात  आपण  नव्या टिना  ईकत आणू़ जा  खेय आता़’’ आपल्या नातवाची समजूत घालताना आबाला किती कठीण गेलं, हे त्याचं त्यालाच माहित! मनोमन त्यानं देवाला हात जोडले़‘देवा! माह्या महादेवले संभायून घे़’


लेखक : संजय मुंदलकर

कथा : महादेव म्हणाला, आता म्हायी लाज तुया हातात...(भाग १)                                            

उर्वरित भाग लवकरच

छायाचित्र प्रतिकात्मक 

Monday, 6 March 2023

NAVANTIKA ... SANJAY MUNDALKAR STORY जगावर मी प्रेम करतोय... पण माझं कोण...कोण माझं? ...... भाग २

‘‘या सगळ्या बाबींसाठी मानवी संवेदना असावी लागते. दुसºयांच्या मनाचा तळ गाठण्याची सवय असावी लागते़ इथं तर आपण स्वार्थ नावाच्या कोषातच बंदिस्त आहोत. कुठून कळणार दुसºयांचं शल्य...? कारण ते टोच्चकं...बोच्चकं? 

Sunday, 5 March 2023

तिसरा भारत येतोय ...

मोठी आर्थिक शक्ती म्हणून वेगाने पुढे येत असल्याने भारताकडे सर्वांची नजर खिळली आहे. सुपातील आणि जात्यातील अशा रूपात जागतिक शक्तीचे विकेंद्रीकरण होत असतानाच भारत जागतिक शांततेचे आवाहन करत आपली प्रतिमा जोपासून आहे.


मागील २४ फेब्रुवारी २०२३ रोजी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले आणि पुन्हा एकदा हा संघर्ष तिसºया महायुद्धाकडे वळणार असल्याच्या चर्चांना वेग आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांनी सुद्धा पुढील काही दिवसांत तिसरे महायुद्ध सुरू होण्याचे संकेत  मिळत असल्याचे स्पष्ट केले. कारण या युद्धामुळे अन्नधान्य आणि पेट्रोलियम पदार्थासंदर्भात जागतिक समस्या निर्माण झाल्या़ त्यामुळे  हा  लढा  केवळ  दोन देशामधील असला तरी त्यात संपूर्ण  जग अप्रत्यक्ष  सहभागी आहेत़ कुणी रशियाला, तर युक्रेनला समर्थन दिले. समाजात जसा  चांगल्या  गोष्टींना पाठिंबा असतो, त्यासम किंवा त्या खालोखाल वाईट बाबींनाही महत्त्व दिले जाते. त्यामुळे लहानग्या युक्रेनच्या बाजूने अनेक देश असले तरी रशियाला  चोपडणारे अनेक देश  आहेत.  

युरोपात सुरू असलेले युद्ध हे शुद्ध वर्चस्वातून उदयास आले़ राजकीय महत्त्वाकांक्षा, विस्तारवादी  आणि  संपूर्ण जगावर वर्चस्व गाजविण्याची  वृत्ती या बाबी कारणीभूत  ठरल्या. म्हणून श्रीमंत-गरीब, विकसित-अविकसित असे विविध गट निर्माण झाले. अशातच युद्ध वर्षभरानंतरही संपुष्टात येण्याची चिन्हे दिसून न आल्याने त्याची वाटचाल नव्या दिशेने सुरू झाल्याचे आंतरराष्ट्रीय  तज्ज्ञांनी म्हटले आहे. पुढील  काही दिवसांत दोन्ही देशांतील संघर्ष संपेल किंवा  जग  तिसºया  महायुद्धाकडे ओढले जाईल. युद्ध सुरू असताना वा ते संपल्यानंतर जग तीन  गटांमध्ये विभागले जाईल. अर्थातच जगाची एकूण एक दिशा  बदलून  नव्या समूहाचे नेतृत्व  भारताकडे आपोआप येईल. 


भांडवलशाही देशांमध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, युरोप, जपान, आॅस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया सहभागी असेल. दुसºया गटात रशिया, बेलारूस, इराण, सीरिया, व्हेनेझुएला, उत्तर कोरिया, चीन  सुद्धा असू  शकेल. चीनची  भूमिका ही ‘शत्रूचा शत्रू आपला मित्र’ अशी न्यायसंगत राहण्याची शक्यता असेल.

विकासशील अर्थात झपाट्याने उदयास आलेल्या तिसºया गटात आखाती देश, दक्षिण आशियायी देश, दक्षिण अमेरिका, भारत आदींचा समावेश असण्याचा दावा करण्यात येत आहे. मागील काही वर्षात भारताने आपली प्रतिमा जोरदार बदलण्याचा प्रयत्न चालविला़ त्यामुळे  जग  देशाला  ‘मानत’ आहे. यूनो, सार्क, क्वाड यासारख्या गटांमध्ये सक्रिय सहभाग, जवळपास सर्वच देशांसोबत द्विपक्षीय संंबंध, आर्थिक, संरक्षण क्षेत्रात सहकार्याची भूमिका या सर्व बाबी भारताने सकारात्मकरित्या जोपासल्या आणि त्याचा परिणाम आता दिसून येत आहे.

याशिवाय  मोठी आर्थिक शक्ती म्हणून वेगाने पुढे येत असल्याने भारताकडे सर्वांची नजर खिळली आहे. सुपातील आणि जात्यातील अशा रूपात जागतिक शक्तीचे विकेंद्रीकरण होत असतानाच भारत जागतिक शांततेचे आवाहन करत आपली प्रतिमा जोपासून आहे. म्हणूनच तिसरा गट हा भारताच्याच नेतृत्वात असण्याचा कयास बांधला जात आहे.

जग भारताकडे झुकण्याचे आणखी कारण म्हणजे २०२० मध्ये चीनने जगावर लादलेल्या कोरोनासारख्या महामारीच्या काळातही शोधलेली सहकार्याची संधी. आणि येथूनच उर्वरित जगाची नजर भारताकडे ‘आशाळभूत’ ठरली. कोरोना प्रतिबंधक मात्रांचे (लस) झालेले असमतोल वितरण सुद्धा जगाला विभागण्यात कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामारीच्या काळातील भेदभावामुळे अनेक आर्थिक कमकुवत देश प्रामुख्याने अमेरिकेपासून  आपोआप दूर झाल्याचे  दिसून येते. भारताने अगदी महामारीच्या सुरुवातीपासून जगाला औषधीसाठा आणि कोरोना प्रतिबंधक मात्राचा तातडीने पुरवठा केला. हीच बाब भारताला जागतिक नेतृत्व प्रदान करू शकते, असे सांगण्यात येत आहे.


(सर्वाधिकार सुरक्षित)

Wednesday, 15 February 2023

मानवाने आपल्यातील जनावर बाहेर काढलाच ...

 

मानवाने आपला मूळ स्वभाव सोडला नाही. तो आधुनिक झाला असला, कितीही तंत्रज्ञानाच्या बाता मारत असला, तरी यासाठी तो कधीचाच जनावर होऊन निसर्गाच्या विरोधात गेला आहे. आणि मग त्याच्या करणीमुळे पूर, महापूर, चक्रीवादळे, भूकंप, ओला आणि कोरडा  दुष्काळ असे अस्तित्वहीन करणारे संकटे कोसळत आहेत. 


मानव उत्क्रांतीतून निर्माण झाल्याचे सांगण्यात  येते़ तो  माकडापासून बनला, असेही ऐकत आलो आहोत़ अर्थातच आपली उत्पत्ती ही प्राणी वा जनावरापासून झाली. आताच्या युगात ही उत्पत्ती मानवात रुपांतरित झाली असली तरी  मानवाने आपला मूळ स्वभाव सोडला नाही. तो आधुनिक झाला असला, कितीही तंत्रज्ञानाच्या बाता मारत असला, तरी यासाठी तो कधीचाच जनावर होऊन निसर्गाच्या विरोधात गेला आहे. आणि मग त्याच्या करणीमुळे पूर, महापूर, चक्रीवादळे, भूकंप, ओला आणि कोरडा  दुष्काळ असे अस्तित्वहीन करणारे संकटे कोसळत आहेत. अगदी त्याने स्वत:ला जिवंत ठेवणारा हवेतील आॅक्सिजन सुद्धा नासवून ठेवला. तहान भागविणारे पाणी सुद्धा दूषित केले. मागील  ६ फेब्रुवारी  रोजी तुर्की आणि सीरिया या दोन देशांमध्ये आलेला भूकंप तेच सांगतोय. 

NAVANTIKA ... SANJAY MUNDALKAR STORY एखाद्यावर प्रेम करणे म्हणजे प्रामाणिक मनानं देवाची प्रार्थना करण्यासारखं आहे. भाग १

सहा महिने नव्हे तर चक्क दोन वर्षांच्या कालावधीत त्यांच्यात केवळ संवाद व्हायचा. चेहरा बघितलाच नाही. छायाचित्रातून तो पाहण्यात आला. तिला भेटण्याचा क्षण आला नाही, असेही नाही. तिच्यासोबतच्या बोलण्यातून तिचं सर्वांग मन निर्भय अनुभवायचा़ तिचा कण कण प्रत्यक्ष रूपात भासायचा, श्वास न श्वास, रंग आणि गंध तो प्राशून घ्यायचा. 




माणसाच्या मनात प्रेम काठोकाठ भरून जाते, तेव्हा स्वाथार्साठी कणभरही जागा उरत नाही. प्रेम ही समर्पणाची, त्यागाची भावना. म्हणूनच आपण प्रिय व्यक्तिला आनंदी बघण्यासाठी काहीतरी मार्ग शोधत राहतो. कुणीतरी म्हटलंय, एखाद्यावर प्रेम करणे म्हणजे प्रामाणिक मनानं देवाची प्रार्थना करण्यासारखं आहे. प्रेम हे सुखाचं घर, आगर आहे. प्रेमाचा खरा अर्थ जीवऩ  त्याशिवाय कुणीही जगणं, श्वास घेणं अशक्य आहे.


निर्भयच्या प्रेमाची गाथाच वेगळी़़़ साधारणपणे कुणी एकानं वा कुणी एकीनं त्याला किंवा तिला पहिल्या नजरेनं पाहिल्यास प्रेम होऊन बसते़ जीव जडतो़... कासावीस होतो. निर्भयनं तर तिला बघितलंच नाही़  महिना, सहा महिने नव्हे तर चक्क दोन वर्षांच्या कालावधीत त्यांच्यात केवळ संवाद व्हायचा. चेहरा बघितलाच नाही. छायाचित्रातून तो पाहण्यात आला. तिला भेटण्याचा क्षण आला नाही, असेही नाही. नियतीनं नित्या आणि निर्भयला दोन ते तीन फुटांपर्यंत समोरासमोर आणले सुद्धा; परंतु तो तिचा चेहरा बघू शकला नाही़  


तिच्यासोबतच्या बोलण्यातून तिचं सर्वांग मन निर्भय अनुभवायचा़ तिचा कण कण प्रत्यक्ष रूपात भासायचा, श्वास न श्वास, रंग आणि गंध तो प्राशून घ्यायचा. ‘ती खूप सुंदर आहे. तिच्या चेहºयावर भाळलो’, असा सर्वसामान्याचा अनुभव त्याला आला नाही. तरीही प्रेम होऊन बसले, अगदी निस्सिम! नित्या तिचं नाव.


file photo

...काळ असा पुढं सरकत गेला की, निर्भयनं नित्या आणि निरजला स्वीकारलं. या दोघांच्या जोडीला निधी आणि निहारिका अशा दोघी दुसºया बाजूला होत्या. ही चौघे एकत्र बंधनात आली, तेव्हा यातील दोघींची मनं कोसळली. त्यांना वाळवंटात उभं असल्याचा भास झाला़  


नित्या आणि निरज मात्र स्थितप्रज्ञ होते, त्यांना निश्चितच हिरवळीची गरज होती. आधाराची, प्रीतीची गरज होती. निर्भय तर अशा परिस्थितीतून तावून सुलाखून निघाला होता. भविष्यातील वावटळ, वादळांबद्दल त्याला अगोदरच जाण होती. त्यामुळं तो या चौघांना घट्ट धरून होता. निरज रक्ताचा नसूनही त्याला प्राणप्रिय होता आणि रक्तातून जन्मलेली निहारिका त्याचा जीव की प्राण होती ..



NAVANTIKA_SANJAY MUNDALKAR













लेखक : संजय मुंदलकर

कथा :   नवंतिका

    जिथं प्रेम हाच देव्हारा ...

            ही कथा सलग नाही

            छायाचित्र प्रतिकात्मक  

            (सर्वाधिकार सुरक्षित)

वाचनाचे महत्त्व नाकारणार तरी कसे?

 दोन  शब्दांने  काय  आणि  किती  खोल  किमया करून परिणाम साधला, हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अभ्यासातून आपण वारंवार अनुभवत आहोत. अक्षराने किमया साधली म्हणूनच जग आजची घडी पाहत आहे़ आणि म्हणूनही लिखाण आणि वाचनाची प्रवृत्ती  प्रत्येकाच्या अंगी असावीच. ती असली म्हणजे वाचकाच्या ज्ञानात आणि प्रगल्भतेत वाढ होते. वाचनामुळे लेखनाची सवय व कल्पनाशक्तीला देखील वाव मिळत असतो. वाचनामुळे रसिकता, सृजनशीलता वाढीस लागते. दुसºयाच्या भावनांविषयी आदर निर्माण होतो. यासारखे अनेक सकारात्मक बदल वाचनामुळे जीवनात होत असतात. 

आज मनुष्याजवळ असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी ताकत आहे़ आणि ती प्रत्येक शब्दांतून  पुढे  आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने ह्यज्ञानासक्तह्ण व्हावे, ती सक्ती मानू नये. या ज्ञानाच्या  सहाय्याने  माणूस प्रगल्भ आणि  समृद्ध तर होतोच आणि त्याचा प्रभावही त्याच्या सर्वांग कार्यशैलीवर पडत असतो. यामुळेच ह्यवाचाल तर वाचालह्ण ही म्हण आजच्या  पिढीला खूप  समर्पक आहे, याची जाणीव होते. 


नव्याने  येणाºया प्रत्येक पिढीत काही  ना काही प्रगती ही होत असते. आजची पिढी इंटरनेट, टी.व्ही., कॉम्प्युटर, स्मार्ट फोन, लॅपटॉप अशा तांत्रिक आणि सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकल्याने वाचनापासून दूर गेली आहे. निवांतपणा मिळाला तरी सुद्धा मोबाईल, कॉम्प्युटर, टॅब, टी.व्ही. अशा मनोरंजनाच्या ह्यतांत्रिक साहित्याह्णत डोके घालून बसलेली पिढी आपण बघत असतो. याच पार्श्वभूमीचा सखोल विचार करून आणि  विविध गॅजेट्सच्या मागे धावणाºया  तरुण पिढीने  किमान  दिवसातील एक तास तरी वाचनासाठी देणे गरजेचे आहे. कारण कोणतेही वाचन हे मनावर कायम ठसत असते. त्याचा खोल प्रभाव रुतत जात असतो.


वाचनात आंबट कढी असे दोन शब्द आल्यास आपल्या मेंदूवर आंबट ही चव कायमची कोरली जाते आणि त्याचवेळी जीभ सुद्धा वळवळते़ असे का होते, याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. हा अनुभव आपण प्रत्येक आठवड्यात घेत असेल तर वाचनात तर कित्येक रंग आणि चविष्ट बाबी ओतप्रोत असतात, मग आपण या नैसर्गिक आस्वादापासून दूर का? वाचन मनाला सुसंस्कृतपणा,विचारप्रगल्भता आणि संशोधनवृत्ती  बहाल करते़  आणि  या वृत्तीतूनच साखळी तयार होत जाते, निरंतर विकासाची! मानवाने लिखाण, वाचनाची किमया साधली़़़सांधली सुद्धा; परंतु  तिचा प्रवाह सुद्धा खंडित केला, हे ही दुर्दैव स्वीकारावे लागते आणि तेही या आधुनिक युगात. दुसरे असे की आपण दिव्यांगांना जर डोळस करून वाचनाची दिव्यदृष्टी देत असेल, तर हा प्रवाह संपवण्याचा अधिकार आपणास कसा? 


महासत्ता होण्याच्या मार्गावर असणाºया देशाची  खरी शक्ती  ही देशातील तरुणाई असेल, असे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम  यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून सांगितले आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन आणि दिलदार स्वभाव  आदींमुळेच डॉ. कलाम यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. डॉ. कलाम यांचे  लेखन आजही आपणास स्फूर्ती व प्रेरणा देणारे आहे. डॉ. कलाम यांनी युवापिढीप्रति दाखविलेल्या विश्वासाला प्रत्यक्षात आणण्यासाठी व प्रगतीशील आणि सुसंस्कृत, सकारात्मक विचारांची पिढी घडविण्यासाठी वाचनाचे  महत्त्व नाकारणार तरी कसे? कुणालाही अवांतर वाचनासाठी वेळ मिळत नाही, अशी सबब पुढे येता कामा नये. वाचन हे व्हावेच़ मग ते वृत्तपत्र, असो जुने-नवे पुस्तक असो. पुढील काळ संस्कारांचा हवा असेल, तर चांगलेच वाचनच नव्हे तर चांगले लिखाण सुद्धा अभिप्रेत आहे. जर कुणी वाचनासाठी सक्ती करत असेल तर, ती स्वीकारणेही तितकीच मोठी जबाबदारी पार पाडण्यासारखे आहे, असे वाटते.

संजय मुंदलकर

(सर्वाधिकार सुरक्षित)

Sunday, 25 September 2022

बाप, बाप होता है ...

 एका पित्याची निराशा खूप घातक असू शकते. दिवसभराच्या श्रमानंतर तो आपल्या बाळांना पाहताच खुश होतो अन् त्याचा थकवा क्षणात पळून जातो. म्हणूनच आपल्या मुलांच्या सुखासाठी तो जगातील सर्व दु:ख सहन करण्याची ताकद राखून ठेवतो. उत्तुंग आशावादी, विविध नात्यांचा शिल्पकार, त्यागी, वज्रमनाच्या आणि तेवढ्याच संवेदनशील नात्याला कुणी दु:ख देता कामा नये.


मागील दिवसांत मोबाईलवर समाज माध्यमातून आलेला एक संदेश वाचण्यात आला. तरुणपणी आणि मध्यमवयात माणसाने कितीही मोठ्या पदावर काम केले असले तरी म्हातारपणात तो अधिकारविहिन तर होतोच़ शिवाय कुटुंबांत अडगळीत पडलेला दिसून येतो. काही हजारांची पेन्शन हाती येत असेल तर बरे, अन्यथा त्याच्याच पत्नीला कुटुंबात असलेले स्थान त्याच्या वाट्याला येत नाही़ येथे त्याची पत्नी सुद्धा मुले आणि सुनांसोबत जुळवून घेताना दिसून येते़ कारण ‘हे’ गेले तर आपल्याकडे कोण लक्ष देणार? ही महत्त्वाची बाब वारंवार तिच्या डोळ्यांसमोर येत असते़ इकडे त्या व्यक्तीची पिता म्हणून महती कधीचीच विसरलेली असते़, असा त्या संदेशाचा काहीसा आशय होता.


वडिल, पिता, बाबा, अब्बा, वालिद अशा अनेक शब्दांचे एकच नाते, ज्यामुळे कुणाचेही आयुष्य पूर्ण होऊ शकत नाही. या पवित्र नात्याची अन्य नात्यांशी तुलना होऊ शकत नाही. बालपणी आपण वडिलांचे बोट धरून चालणे शकतो. त्याच्याच कुशीत सुख-दु:खात निश्चत असतो. लहानपणीचे सर्व हट्ट तोच पूर्ण करतो. चॉकलेट, खेळणीपासून ते लॅपटॉप, बाईक, कार आणि उच्चशिक्षणापर्यंतच्या सर्व मागण्या पूर्ण करणारा एक पिताच असतो. आज अशी वेळ आली, की या आधुनिक आणि धावपळीच्या आयुष्यात ( आणि ही धावपळ आणली कुणी, हा एक वेगळा विषय) मुलांजवळ आपल्या पित्यासाठी वेळ नाही. 


पिता हा ईश्वरासारखाच... जन्माबरोबरच या व्यक्तीशी आपला सामना होतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो सोबत असतो. एक पिता आपल्या मुलांचा सर्वांत चांगला शिक्षक असतो. ही पिता नावाची सावली आपल्या मुलांसोबत सदैव असतो आणि त्यांच्याच सर्वांगीण उन्नतीसाठी आयुष्यभर झटत असतो.

याबाबत जाँर्ज हर्बर्ट यांचे एक सुंदर वाक्य आहे. ते असे, की एक पिता शंभर शाळामास्तरांपेक्षा मोठा असतो. तो आपल्या मुलांना नेहमी यशासाठी प्रोत्साहित करतो. एका पित्याचे हृदय नारळासारखे वरून कठोर आणि तितकेच आतून मुलायम आणि संवेदनशिल असते. जेव्हा मुले आपल्या मार्गावरून चुकीने बाजूला होण्याच्या स्थितीत असतात, त्याचवेळी हा पिता राग आणि प्रेमाने समज देऊन त्यांना सन्मार्ग मिळवून देतो.


एक समाजशास्त्रज्ञ म्हणतो, एका पित्याची निराशा खूप घातक असू शकते. दिवसभराच्या श्रमानंतर तो आपल्या बाळांना पाहताच खुश होतो अन् त्याचा थकवा क्षणात पळून जातो. म्हणूनच आपल्या मुलांच्या सुखासाठी तो जगातील सर्व दु:ख सहन करण्याची ताकद राखून ठेवतो. मातृपितृ भक्तीचे सुंदर उदाहरण आपल्या पुराणात दिसून येते. खांद्यावर मातापित्यांना तीर्थक्षेत्री घेऊन जाणारा श्रावण जेव्हा त्यांची तहान भागवण्यासाठी ओढ्यावर पाणी आणावयास जातो, त्याचवेळी  राजा दशरथाचा एक तीर त्याच्या शरीरात शिरतो. प्राण जाण्यापूर्वी तो दशरथाला विनवतो, की माझे माता-पिता तहानलेले आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचून ते पाजा.  अशा या उत्तुंग आशावादी, विविध नात्यांचा शिल्पकार, त्यागी, वज्रमनाच्या आणि तेवढ्याच संवेदनशील नात्याला कुणी दु:ख देता कामा नये.


संजय मुंदलकर

(सर्वाधिकार सुरक्षित) 

Thursday, 22 September 2022

सहा लाखांची झोप

 झोपेत पडणारी स्वप्न माणसाच्या आरोग्याला महत्त्वाची आहे. या संदर्भात  निद्रा आणि  स्वप्न तज्ज्ञ डॉ. नायमन म्हणतात, की  माणसाची कार्यक्षमता, इच्छाशक्ती  आणि भावनिक यांचे  संगोपन आणि जोपासना स्वप्नांमुळे होते. स्वप्नविरहित  झोप  ही मोठ्या धोक्याचा इशारा आहे. 

मानवजातीला सर्वांत जास्त काय प्रिय असेल, ती झोप असते़ अगदी हक्काची  असणारी, कुठेही कधीही झोप काढणे शक्य जवळ जवळ शक्य असतेच. आणि  झोप काढून पैसे कमावता येत असेल तर...? मग मज्जाच मजा!असाच  काहीसा  प्रकार मागील दिवसांत घडला आहे. एका स्पर्धेतून बंगाली तरुणीला सर्वांत जास्त वेळ झोप काढल्याबद्दल चक्क  सहा  लाख रुपयांचे  बक्षीस  देण्यात आले. 

या स्पर्धेत तब्बल साडेचार  लाख स्पर्धकांनी भाग घेतला आणि पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर(हुगळी) येथील त्रिपर्णा  चक्रवर्ती  हिने  सलग १०० दिवस  ९  तास  झोपून विक्रम केला आणि सहा लाख कमावले. याबाबत त्रिपर्णाने सांगितले, की  लहानपणापासूनच मला झोपण्याची  खूप आवड आहे. जेव्हा कधी झोप येते, तेव्हा मी बिनधास्तपणे झोप काढते. अनेकवेळा  परीक्षेच्या वेळीही झोपेचा अनुभव घेतला आहे...आता बोला!

त्रिपर्णाने आपण झोपाळू असल्याचा दावा केला असला तरी  माणसाची झोप कमी झाली असल्याचे अनेकदा सर्वेक्षणातून आढळून आले आहे. विशेष म्हणजे या झोपेचे आणि स्वप्नाचेही दूध-सायीचे नाते आहे. तणावाखाली झोपणाºया माणसाला स्वप्न  पडण्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात येते.

स्वप्नं बघण्यात  वेळ वाया घालवू नकोस , असे माणसाला वारंवार कुटुंबाकडून सांगण्यात येते. (चक्क इशारा देण्यात येतो)  हातून  चूक झाली  की  झोपला होतास का किंवा झोपली होती काय, असा संताप व्यक्त होतो. सुस्त माणसाला ‘झोपाळू’ म्हणून  हिणवलेही जाते. थोडक्यात  म्हणजे  झोप  हा माणसाचा कायम शत्रू असल्याचे मनावर बिंबवले जाते. आता मात्र ही झोप आधुनिक जगातील माणसावर सूड घेत आहे. तंत्रज्ञान त्याच्या पायाशी लोळण घेत आहे. लक्ष्मी आणि  सुखसाधने  प्रसन्न  असली तरी झोपेने त्याच्याकडे पाठ फिरवली आहे. 

भारतात आणि जगात सुद्धा अपुरी झोप हा साथीचा आजार बनला आहे. सुरुवातीच्या दिवसांत यश, पैसा आणि उपभोग याकडे धावणाºया माणसाने झोपेकडे दुर्लक्ष केले. परिणामी तो ताण-तणावाच्या अंमलाखाली बिछाण्यावर पडतो, झोप मात्र कोसोदूर असते. गोळ्या घेतल्या तरच त्याला झोप येते. दुसरे असे की या कृत्रिम झोपेमुळे  त्याला  स्वप्न  पडेनाशी झाली आहे. झोपेत पडणारी स्वप्न माणसाच्या आरोग्याला महत्त्वाची आहे. या संदर्भात  निद्रा आणि  स्वप्न तज्ज्ञ डॉ. नायमन म्हणतात, की  माणसाची कार्यक्षमता, इच्छाशक्ती  आणि भावनिक यांचे  संगोपन आणि जोपासना स्वप्नांमुळे होते. स्वप्नविरहित  झोप  ही मोठ्या धोक्याचा इशारा आहे.  झोपेची उपेक्षा  माणसाला  फार महागात पडते.  हृदयविकार, रक्तदाब पोटाचे आजार असे आजार (झोपेच्या अभावामुळे ) मागे लागले आहे.

अन्नासाठी दाही दिशा फिराव्या तसे आधुनिक  माणसाला  झोपेसाठी  दहा डॉक्टरांकडे फिरावे लागत असून, मोठा खर्च होत आहे. निद्रानाशाच्या आजाराची साथ  जगात वणव्यासारखी पसरत असून, एकट्या अमेरिकेत  या दुखण्यावर दर वर्षी ५० ते १०० अब्ज डॉलर्स  खर्च होत आहेत.  झोपेच्या गोळ्या सर्वाधिक  खपाचे औषध बनले आहे. 

 ‘डाएट’चा बाऊ  करून  माणसाने खाण्या-पिण्यातील आनंद गमावला आहे. झोपेच्या भयामुळे  ही स्थिती निर्माण झाली आहे. झोप ही शरीराला आवश्यक विश्रांती आहे. कामधाम सोडून झोप काढली पाहिजे, असेही नाही. मात्र, दुपारी जेवणानंतर २० मिनिटांची झोप पुरते. रात्री  देखील ८ ते  ९ तासाची झोप सरसकट आवश्यक नसते. भुकेप्रमाणे  झोपेचे प्रमाण माणसागणिक भिन्न पातळीवर असते. एखाद्या माणसाला रात्री तीनचार तासांची झोपसुद्धा पुरते . तिच्याआधारे  तो दिवसभार वेगाने  काम करू शकतो. जाग  येताच क्षणी तरतरी वाटत असेल तर  पुरेशी झोप मिळाली आहे असे समजावे.   झोप ही बहात्तर दुखण्यांवरील  रामबाण इलाज आहे, असे  डॉ. नायमन निक्षून सांगतात.                               

संजय मुंदलकर

(सर्वाधिकार सुरक्षित) 

Tuesday, 20 September 2022

सण आणि कॉर्पाेरेट आयुष्य

 लोकांना चटक लावण्यात आली आणि पुढील कारस्थानी लोक लाळ घोळत घात लावून बसली आहेत आणि सावज टप्प्यात आले की तुमच्या ‘व्हाया मोबाईल’ बँकेच्या खात्यातून पैसा कायमचा चटका लावून कसा लंपास करतात, हे कळत सुद्धा नाही.  कारण आधुनिक होण्याचे, कॉर्पाेरेट  आयुष्य जगण्याचे भूत थयथय करत नाचत आहे. 


मागील  २० ते २५ वर्षांत  समाजातील काही वर्गांचे जीवनमान फार बदलून गेले़ काही घटकांचा जीवन आणि मरण यातील दरी बुजवणारी गरज ही मोजक्या लोकांचा शौक, बडेजावपणा, आकर्षण आणि देखावा बनली, हे दुर्दैव मानावे का? ताटातील  भाजीपोळीची  जागा आता मोबाईल, महाग कपडे, दागिने, एचडी टीव्ही, टॅब, संगणक, लॅपटॉप, एसी  आदींनी घेतली. पोट भरण्यासाठी अन्नाची गरज भासेनाशी झाली़ इतकेच  काय प्राणवायूही नकोसा झाला आणि तो मिळणार कुठून, कसा?   कारण प्रदूषणही  याच समाजाने, तुम्ही  आम्ही पसरवले़ सर्व कसे ‘आॅनलाईन’ झाले़ ‘आॅर्डर’ करताच  हाती  नव्हे  तर  पायाशी  लोळण घेण्याचा प्रकार वाढला़ अगदी चोवीस तास सर्व सेवा मोबाईलवर काही सेकंदांच्या ‘क्लिक-क्लिक’वर उपब्लध होत आहेत. 

आता तर समाजाच्या सणांची संकल्पनाच पार बदलून गेली़ सणसुद्धा प्रायोजित झाले़ होळी, पोळा, दसरा अशा सणांच्या माध्यमातून ते आपणास दिसून येते़ आता तर दिवाळीसण ‘कॉर्पाेरेट’ होण्याकडे निघालाय़ हा  सण पूर्वीसारखा साजरा होताना दिसून येत नाही़ वेब  पोर्टल्सनी सध्या आॅनलाइन  विक्रीचा धमाकाच सुरू केला आहे. आपल्या वेबसाईटवर जगभरातील ब्रँडचा भडिमार केला जात आहे़ प्रत्येक पोर्टल  ग्राहकाला आकर्षित करत आहे.  प्रसारमाध्यमातून  तर एक महिन्याभरापासूनच ‘आॅनलाईन’ खरेदीच्या  एकेक पानाच्या  जाहिराती सुरू होतात़ ज्याच्या त्या वाचनात आल्यात त्याचे हात मोबाईल, संगणकाकडे वळतात़ (कारण येथेही इंटरनेट, वायफाय तयार असतो़) ‘आॅनलाईन कंपन्या’ तर सज्ज झालेल्या असतात़ 

एके काळी केवळ  पुस्तक, कपडे, भेटवस्तू, ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर असणारा कल, आज लाईफ स्टाईल साहित्यांकडे वळला आहे. मनातील भावना ईमोजीने गुंडाळून टाकल्या. मातापित्यांजवळ, मित्रांजवळ, नातेवाईकांजवळ भावना जाहीर करण्यास  शब्द आहेत; परंतु  ते व्यक्त करण्यास वेळ नाही़ कारण  इतरांसाठी आॅनलाईन उपस्थित राहायचे आहे. त्यातून कृत्रिम आशा-अपेक्षा पूर्ण करायच्यात़

 जो  तो आपले दैनंदिन आयुष्य ‘आॅनलाईन’मुळे कसे ‘स्मार्ट’ करता येईल, हा विचार करतो आहे़ दुचाकी, हातात स्मार्ट मोबाईल  आणि  अंगावर आकर्षक कपडे असले म्हणजेच ‘आयुष्य ’अशी नवी  संकल्पना उदयास  आली आहे़, मग हाताशी काम नसले  तरी  चालेल़  शिकार  असलेल्या  प्राण्याला चटक लावून  ‘स्लो  पॉयझन’ देत त्याची शिकार करणे, हा ‘कॉर्पाेरेट’  असे गोंडस  नाव असलेल्या कंपन्यांनी  व्यवसाय स्वीकारला  आहे़ ‘ग्राहकाचे  संतोष  हेच आमचे समाधान’ ही बाब केव्हाच मागे पडली़ आता तर आॅनलाईन कंपन्या मोबाईलऐवजी विटाचे तुकडे वा कपडे धुण्याचे साबण पाठवते आणि मग सुरू होतात, तक्रारी आणि तक्रारी...शेवटी  दोघेही  पोहोचतात कोर्टात़ 

 दुकानात जाऊन चार पैशांची घासाघीस  करीत वस्तू विकत घ्यायची, ही  पारंपरिक खरेदी घरातील डेस्कटॉपच्या विंडोमध्ये किंवा मोबाईलमध्ये  खुणावत  असली  तरी  त्याचे प्रमाण किती? देशातील किती लोकसंख्याकडे संगणक आहेत...इंटरनेट आहे़ जिथे अजूनही भूक मारली जाते, रोजगाराअभावी आत्महत्या होते़, पैसे नाही म्हणून शिक्षण नाही, दारिद्र्य-गरिबी पाठलाग सोडत नाही, तिथे आॅनलाईन आयुष्य, आॅनलाईन खरेदी कुठून येणार? 

लोकांना चटक लावण्यात आली आणि पुढील कारस्थानी लोक लाळ घोळत घात लावून बसली आहेत आणि सावज टप्प्यात आले की तुमच्या ‘व्हाया मोबाईल’ बँकेच्या खात्यातून  पैसा कायमचा चटका लावून कसा लंपास करतात, हे कळत सुद्धा नाही.  कारण आधुनिक होण्याचे ,कॉर्पाेरेट  आयुष्य जगण्याचे भूत थयथय करत नाचत आहे. 

शेवटी प्रश्न काही दिवसांच्या आयुष्याचाच आहे... आणि दसरा आणि दिवाळी सण काही आठवड्यांवरच येऊन ठेपला आहे.

संजय मुंदलकर

(सर्वाधिकार सुरक्षित) 

Monday, 19 September 2022

प्लास्टिकला नाहीच म्हणा ...

 सध्या पर्यावरणाचा नको तितका तोल ढासळला आहे. अर्थात हे सर्व नैसर्गिक असले तरी त्याला कारणीभूत आपण सर्व मानवजातच आहो. पृथ्वी नष्ट होण्याचा मार्गावर असताना तरी ही बाब आपण नाकारण्याचे धाडस करू शकणार नाही. ओला-कोरडा  दुष्काळ  (यात सर्व आले-पूर, महापूर, जीवघेणे तापमान आदी) हा प्रकार कुणी आणला, निसर्गाने तर नक्कीच नाही! ही कुºहाड आपण आपल्या पायावर मारून घेतली. जंगले तोडली, शेतजमिनी संपवल्या, नद्यांच्या प्रवाहात अतिक्रमण केले. रसायनाला अति महत्त्व दिले. जमिनी नापिक करून सोडल्या. पारंपरिकतेला तुच्छ लेखत सेंद्रिय खताला नामशेष केले. पावसाचे पाणी मुरायला जागा ठेवली नाही. या सर्वांचा परिणाम काय तो, आपण आपल्या अस्तित्वावर उठलो. 

आता नवीन संकट उभे ठाकले आहे़ आणि ते म्हणजे प्लास्टिक. पूर्वी आपल्या दैनंदिन कामात प्लास्टिकचा फारच कमी होत होता. साधारणत: कागदपत्रं ठेवणे, कपडे ठेवण्यासाठी उपयोग होत असे. मात्र, काही वीसेक वर्षांपासून या प्लास्टिक  कॅ रीबॅगचा  इतका वापर वाढला की तो मानवी वा जनावरांच्या जीवावर उठला आहे. प्लास्टिकाा पिशव्यांची  उपलब्धता वाढली आणि  हा  एक  सोपा पर्याय आहे, हे दिसून आल्यानंतर त्याच्या वापरापेक्षाही गैरवापरच अधिक वाढला, हे लक्षात येण्यास फार वेळ लागला. तोपर्यंत पाणी नाकातोंडात जावून गुदमरायला लागले होते.

प्लास्टिकच्या अतिवापरापेक्षा गैरवापरामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होत आहे. आज  कॅ रीबॅगचा वापर ही गरज वा सोय कमी आणि स्टाईल अधिक बनली आहे. साध्या औषधाच्या गोळ्या घेतल्या तरीसुद्धा लोक  दुकानदाराकडे          कॅ रीबॅग मागतात आणि ती  दिली नाही, तर जोरजोरात भांडतात देखील. शेवटी दुकानदारही ग्राहक टिकवायचे असते म्हणून त्यांची मागणी पूर्ण करतात. बरेचदा  कॅ रीबॅग इतक्या पातळ असतात  की, घरी जाईपर्यंत त्या फाटतात आणि दुसºया दिवशी त्या कचºयासोबत उकिरड्यावर जातात. याचा दुष्परिणाम किती मोठ्या प्रमाणात होतो याचा विचार ना दुकानदार  करतात, ना तुम्ही आम्ही. सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे कचºयामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती प्लास्टिकच्या पिशव्यांचीच.

समुद्रात तर भरतीच्या वेळी कितीतरी टन कचरा किनाºयावर फेकला जातो. त्यात प्लास्टिक सर्वांधिक असते. मुंबईत ही बाब अनेकदा अनुभवास आली आहे. समुद्रकिनारी गावांमध्ये, शहरांमध्ये  समुद्राच्या पाण्याचा तळ प्लास्टिकने झाकलेला आहे, इतका प्लास्टिकचा वापर वाढलेला आहे. ही एका भीषण धोक्याला जन्म घालणारी गोष्ट आहे. याचा जीवसृष्टीवर-जलसृष्टीवर अतिशय प्रतिकूल परिणाम होतो. 

समुद्राच्या, नद्यांमध्ये राहणारे जलचर पाण्यात टाकलेले प्लास्टिक खाऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे मृत प्राणी कापल्यानंतर त्यांच्या पोटात प्लास्टिक आढळल्याचे दिसून आले आहे. आपल्याकडे नदीत किंवा समुद्रात निर्माल्य टाकताना  तेही प्लास्टिक पिशवीसह टाकले जाते. घरातील  कचराही प्लास्टिक पिशवीमध्ये बांधून कचराकुंडीत   टाकला जातो. हा कचरा जी जनावरे खातात, त्यांच्या पोटात प्लास्टिक जाते. मोकाट फिरणाºया गायी किंवा म्हशींच्या पोटातून तीस-चाळीस किलो प्लास्टिकचे कागद काढण्यात आले आहेत. 

पूर्वी प्लास्टिकच्या पिशव्यांचा पर्याय नव्हता, त्यावेळी कापडी पिशव्या वापरल्या जात होत्याच ना? मग आता का होत नाही? याचे मुख्य कारण म्हणजे आज मोठमोठ्या मॉलमध्ये जाऊन खरेदी करून प्लास्टिकच्या पिशव्यांमधून सामान आणणे हे मोठेपणाचे लक्षण वा फॅ शन मानली जात आहे. अशावेळी मॉल्सवाल्यांनी वा दुकानदारांनी कापडी पिशव्यांचा पर्याय  निवडणे आवश्यक आहे. या कापडी पिशव्यांवर  त्यांना  त्यांची जाहिरातही करता येते. 

प्लास्टिक पिशव्यांना कापडी पिशव्यांचा वापर करणे हाच पर्याय आहे. प्लास्टिकचा वापर टाळणे हा एक पर्यावरणपूरक आणि  कालसुसंगत विचार आहे. पर्यावरणाच्या सुरक्षिततेचा विचार करून राज्याच्या पर्यावरण विभागाने प्लास्टिकवर बंदी आणली आहे, त्याला सर्वांनी पाठिंबा देणे, सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण मानवी रक्तात  प्लास्टिकचा अंश मिळाल्याचे वृत्त वाचण्यात आले आहे.