Sunday, 26 January 2020

अख्खं जगच बेरोजगारीच्या वणव्यात


एखादे काम वा नोकरी वा रोजगार करण्याची पात्रता आणि कौशल्य असूनही (जोडीला काम करण्याची इच्छा) ते काम न मिळणे वा उपलब्ध न होणे म्हणजे तो व्यक्ती बेरोजगार समजण्यात यावा अशी ढोबळमानाने बेरोजगारीची व्याख्या करता येईल. मात्र, उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळाली नाही म्हणून आम्हीच बेरोजगार असे मानता कामा नये़ कारण बेरोजगारीचा संबंध हा केवळ शिक्षणाशी जोडू नये, तर संबंधित व्यक्तिची काम करण्याची पात्रता, त्याचे कौशल्य विचारात घ्यावे़, तरच बेरोजगारीच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर कायमचा उपाय शोधता येईल. कारण बेरोजगारी ही प्रत्येक क्षेत्रात आहे़ मग ते शिक्षण क्षेत्र असो, शेती क्षेत्र असो, बांधकाम, लहान मोठे उद्योग, सरकारी-निमसरकारी संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने वा तत्सम. या मोठ्या संकटाने अख्खं जगच बेरोजगारीच्या वणव्यात होरपळत आहे. कारण एकतर नोकरी नाही किंवा असेल तर ती टिकून राहिल की नाही अशी स्थिती तयार झाली आहे. ‘एडलमिन ट्रस्ट बॅरोमीटर’ या अहवालानुसार जगभरातील ८३ टक्के कर्मचाºयांना त्यांच्या नोकरीची किंवा रोजगाराची चिंता असल्याचे म्हटले आहे. यावरूनच काय ते स्पष्ट होईल.

रोजगारक्षमता नाही

धक्कादायक म्हणजे २०२० मध्ये बेरोजगारीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) ‘द वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आऊटलूक (डब्ल्यूईएसओ) : ट्रेंड्स २०२०’ या अहवालात वर्तवला आहे. हा अहवाल २० जानेवारी २०२० रोजी जाहीर करण्यात आला. यंदा जागतिक बेरोजगारीमध्ये २५ लाखांनी (२.५ मिलिअन) भर पडणार असून सुमारे ५० कोटी लोक अल्प मोबदल्यात काम करीत असल्याचे देखील यात नमूद करण्यात आले आहे.
मागील नऊ वर्षांपासून जागतिक बेरोजगारीचे प्रमाण बहुतांश स्थिर आहे. मात्र, जागतिक आर्थिक वाढ मंदावली आहे. याचाच अर्थ जागतिकस्तरावर कामगारांचे प्रमाण वाढत आहे; परंतु रोजगारक्षम तरुणांसाठी पुरेशी नवीन रोजगार निर्मिती होत नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. परिणामी यंदा जागतिक बेरोजगारी सुमारे २५ लाखांनी वाढणार असल्याचे ‘आयएलओ’ने म्हटले आहे. ही संयुक्त राष्ट्रांची संघटना असून आंतरराष्ट्रीय कामगार मानकांची स्थापना करून साजेशा रोजगारास चालना देणे आणि सामाजिक न्याय वाढविणे असे संघटनेचे प्रमुख कार्य आहे. याशिवाय विकसनशील देशांमध्ये सन २०२०-२१ मध्ये बेरोजगारी प्रचंड वाढणार असून २०३० पर्यंत जगभरातून गरिबीचे उच्चाटन करण्याच्या मोहिमेत अडथळे निर्माण होतील, असे म्हटले आहे.
डब्ल्यूईएसओनुसार, जगभरात १८.८ कोटी (१८८ मिलिअन) लोक बेरोजगार असल्याचे मानन्यात आले आहे़ १६.५ कोटी लोकांजवळ वेतन वा मजुरी मिळेल, अशा कामांचा अभाव आहे, तर ४७ लाख (४७० मिलिअन)लोक  रोजगारांच्या समस्यांनी त्रस्त आहेत. धक्कादायक म्हणजे १२ कोटी लोकांनी कंटाळून कामाचा शोध घेणेच बंद केले आहे. शहरातील सुशिक्षित युवावर्गात बेरोजगारीचा दर अधिक आहे़ २० ते २४ वर्षे वयोगटात बेरोजगारीचा दर ३७ टक्के इतका आहे़ वाढती बेरोजगारी आणि खोल अशा आर्थिक समानतेमुळे नोकरी वा रोजगारामुळे एक चांगली जीवनशैली उपभोगास मिळणे फार कठीण झाले आहे. ‘आयएलओ’चे महासंचालक ग्ये रायडर यांनी म्हटले की जगात बहुतांश लोकांना काम मिळवण्यासाठी श्रम बाजारावर अवलंबून राहावे लागत आहे़ (अर्थात याठिकाणी काम मिळेलच ही शाश्वती नसते.) या बाजाराच्या स्थितीवरून चांगले वेतन हाताशी येऊन जीवनमान सुधारण्याची शक्यताच नाही. कामातील समानता आणि नोकरी जाण्याची भीती यामुळे चांगल्या भविष्याची कल्पना केवळ स्वप्नातच राहणार आहे. दरम्यान, आंतराष्ट्रीय कामगार संघटनानुसार प्रतिदिन ३़२० अमेरिकन डॉलर्सपेक्षा (२२८़२८ भारतीय रुपये) कमी उत्पन्न मिळवणारा व्यक्ती हा गरिबी या व्याख्येत बसतो.

भारताचे काय...

आयएलओचा अहवाल नव्या वर्षात आला असला तरी डिसेंबर २०१९ मध्ये भारतातील काही संस्थांनी आपल्या देशाच्या रोजगार क्षेत्रातील स्थितीचा अंदाज व्यक्त केला होता़ इंडियन स्टाफिंग फेडरेशन, ग्लोबल हंट इंडिया, इंडिया प्रॉडक्ट लीडर अँड करिअर यासारख्या खासगी संस्थांनी काही महत्त्वपूर्ण अंदाज व्यक्त केले होते. इंडियन स्टाफिंग फेडरेशनच्या अध्यक्ष रितूपर्णा चक्रवर्ती यांनी रोजगाराच्या दृष्टीने नवीन वर्ष स्थिर असेल. उद्योगात गुंतवणूक वाढल्यास रोजगारांत वाढ होण्याची शक्यता आहे, असे म्हटले होते. ग्लोबल हंट इंडियाचे प्रबंध संचालक सुनील गोयल यांनी जीडीपी दर खाली आल्याने २०२० मधील पहिली तिमाही काही विशेष चमत्कार दाखणार नाही़ मात्र, वर्षाचा उत्तरार्ध रोजगारांच्या दृष्टीने काही संधी उपलब्ध होऊ शकते़ कारण उद्योगांकडून आपल्या कारभारच्या विस्ताराकडे लक्ष वेधल्या जाईल, असे म्हटले आहे. त्यामुळे पुढील काही काळ तरी प्रतीक्षा करावी लागणार, हे निश्चित!

© संजय इस्तारी मुंदलकर