Wednesday, 9 February 2022

लता दीदींच्या ‘गांधर्व स्वरा’नेच चित्रपटांतील नायिकांना दिली प्रसिद्धी

लता दीदींनी गायिलेल्या गाण्यांतूनच भारतीय चित्रपटांतील नायिकांना फार मोठ्या प्रसिद्धीचे वलय, यश आणि वारेमाप पैसा मिळाला, ही बाब दुर्लक्षून आणि नाकारून कदापिही चालणार नाही. अनेकदा कथा दमदार वा अभिनय कसदार नसतानाही केवळ गाण्याने प्रसिद्धी मिळाल्याचा अनुभव देशातील हिंदी चित्रपटक्षेत्राने घेतला आहे़ दीदींच्या स्वरांनी कित्येक नायिकांच्या अभिनय प्रवासाचा मार्ग मोकळा केला, त्यांच्या यशाचा जो कळस उभा राहिला त्याचा पाया बनण्याचे महत्कार्य केले. जुन्या-नव्या पिढीतील नायिकांना आपला स्वर दिला आणि त्यांनाही यश मिळवून दिले. या नायिकांच्या कारकिर्दीत मैलाची दगड ठरलेली काही गाणी केवळ दीदींनीच दिली.






संगीत आणि गायनासाठी आपले सारे आयुष्य पणाला लावणाºया एकमेव म्हणजे लता दीदी मंगेशकर. दीदींनी अनेक विक्रम रचले. त्यांच्या ताना, हरकती आणि आवाजाची कोणालाही सर नाही आणि पुढेही नसेल. प्रत्येक गाण्यात त्या खरोखरच जीव ओतत होत्या. कधी गाण्यातून ममता दिसली, कधी एका प्रेयसीची प्रीती, कधी अल्लडपणा, कधी कारुण्य, कधी त्याच आवाजातून पराक्रमाची गाथा कानी आली. उस्ताद अमानत अली खान, अमानत खान देवासवाले, पंडित तुलसीदास शर्मा ही लता दीदींचे गुरू होते. याशिवाय त्यांनी संगीतकार अनिल बिस्वास यांच्याकडूनही प्रशिक्षण घेतले. 

कैक पिढ्यांसाठी लता दीदींचा आवाज म्हणजे एक संस्कार होता...आणि याच संस्कारातून भारतीय चित्रपटांतील कलाकारांना विशेषत: नायिकांना ओळख मिळाली. यात अभिनयाचा अधिक वाटा असला तरी लता दीदींनी गायिलेल्या गाण्यांतूनच भारतीय चित्रपटांतील नायिकांना फार मोठ्या प्रसिद्धीचे वलय, यश आणि वारेमाप पैसा मिळाला, ही बाब दुर्लक्षून आणि नाकारून कदापिही चालणार नाही. अनेकदा कथा दमदार वा अभिनय कसदार नसतानाही केवळ गाण्याने प्रसिद्धी मिळाल्याचा अनुभव देशातील हिंदी चित्रपटक्षेत्राने घेतला आहे़ विशेषत: नव्वदच्या दशकातील अनेक चित्रपटांबाबत बोलता येईल.


लता दीदींनी भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रत्येक संगीतकार आणि गायकासोबत गाणे गायिले आहे. याबाबत त्या पहिल्या गायिका ठरल्या आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. दीदींनी देशातील प्रत्येक नायिकाला ओळख दिली़ अगदी १९४९ पासून तर आजतागतच्या अर्थात दोन हजार सालातील आजपर्यंतच्या कालावधीतील नायिकांना त्यांनी आपल्या स्वराने प्रसिद्धी मिळवून दिली. अगदी नर्गिस, मधुबाला, वहिदा रहमान, माला सिन्हा, हेमामालिनी, स्मिता पाटील, परवीन बाबी, झिनत अमान, रेखा, जया भादुरी, मीनाक्षी शेषाद्री, काजल, माधुरी दीक्षित, भाग्यश्री, राणी मुखर्जी या प्रत्येक पिढीतील नायिकांना दीदींनी आपला आवाज दिला़ तांत्रिकदृष्ट्या प्रत्येक गाण्याच्या छायाचित्रणात नायिका गाणे (आपले ओठ हलवत) गात असली तरी त्यामागे स्वर होता लता दीदींचा! ही गाणी सर्वसामान्य रसिकांंच्या ओठांवर रुळल्याने चित्रपटांतील नायिकांना पुढील चित्रपटांचा मार्ग मोकळा होत गेला.


‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे गाणे निर्माता दिग्दर्शक अभिनेते राज कपूर यांच्या बरसात चित्रपटातील. यातील स्त्रीस्वर मात्र लता दीदींचा होता आणि ते गाणे लोकप्रिय ठरले़ अर्थात नायिका नर्गिस यांना त्याचा फायदा झाला. ‘आयेगा आनेवाला’ हे महलमधील रहस्यमय,रोमांचित करणारे गाणे मधुबाला यांच्यावर चित्रित करण्यात आले़ या गाण्याला फार मोठे यश मिळाले, तसेही नायिका मधुबाला यांनाही!


वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित मधुमतीमधील ‘आजा रे मै तो..’ या सारखी अनेक गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. ‘इन्ही लोगो ने...’, ‘मौसम है आशिकाना...’ पाकिजामधील गाण्यांबद्दलही हेच बोलता येईल. लता दीदींचा स्वर आणि मीनाकुमारी यांचे पदलालित्य यांची सरमिसळ होऊन त्याचा फायदा नायिकेलाच झाला. 


‘आ जाने जा...’ हे हेलन यांच्यावर चित्रित केलेले गाणे. इन्तकाममध्ये त्या नायिका नव्हत्या;परंतु दीदींच्या आवाजातील गाण्याने हेलन यांना लोकप्रिय केले. याच धर्तीवर समाधी चित्रपटातील ‘बंगले के पिछे...’ या गाण्याबद्दल बोलता येईल़ आशा पारेख यांना ओळख मिळवून देण्यात दीदींच्या या गाण्याचा महत्त्वाचा वाटा होता. ‘शर्मिली’ तील ‘खिलते है गुल यहाँ...’ने राखी यांना यश दिले. माला सिन्हा, हेमा मालिनी, रेखा, जया भादुरी यांच्याबद्दल हेच बोलता येईल. 


‘तेरे बिना जिंदगी से कोई सिकवा नही...’ या गाण्याने दीदींनी सुचित्रा सेन यांना प्रसिद्धीच्या झोकात आणले. ‘आ जा आयी बहार...’ मधून नायिका साधना यांना मोठे यश मिळाले. ‘एक प्यार का नगमा है...’ यातून नंदा यांना फायदाच मिळाला. नंतरच्या काळात डिम्पल यांना ‘हम तुम एक कमरे में बंद हो...’ या गाण्यातून दीदींचा अल्लड स्वर नायिकेलाही अनुभवता आला. शबाना यांना ‘हजार राहे मुडके देखी...’ या आणि अन्य गाण्यांतून मोठी प्रसिद्धी मिळाली. हेमामालिनी यांना ‘जिंदगी की ना टुटे लडी...’ नितीन मुकेश यांच्यासोबतच्या गाण्याने यशाचा मार्ग मोकळा झाला. नौशाद यांच्या संगीत निर्देशनातील ‘ऐ दिल ए नादान...’ या गाण्याबाबतही हेच बोलता येईल. मेरे नशीब में तू है के नही, ये मुलाकात एक बहाना या गाण्यांनी हेमा यांना स्वप्नसुंदरी होण्यास बाध्य केले, हे कसे नाकारता येईल.‘काँटो से खिचके ये आँचल...’ हे गाणे वहिदा रहमान यांच्यासाठी बनले होते की काय, असे नकळत वाटून जाते. ‘आशा’ मधील ‘शीशा हो या दिल हो...’ ने रिना रॉय यांना यशाची गोडी दिली. ‘रोटी, कपडा और मकान’ मधील ‘मैं ना भुलूंगा...’ने झिनत अमान यशाची पायरी चढल्या. 


१९८१ मधील ‘एक दुजे के लिये’ मधील ‘सोलह बरस की...’ या गाण्याने तर रती अग्निहोत्रीला रातोरात स्टारच्या रांगेत बसवले. ‘सिलसिला’ मधील ‘देखा एक ख्वाब तो...’ ने रेखाच्या यशात भरच टाकली. १९८५ मध्ये ‘राम तेरी गंगा मैली’ मधील सर्व गाणी मंदाकिनीच्या मोठ्या यशात सहभागी होती.


‘यारा सिली विरह का...’ आणि ‘दिल हूम हूम करे...’ या अनुक्रमे लेकीन आणि रुदालीमधून डिम्पल कपाडिया यांना नवी ओळख मिळाली. ही दोन्ही गाणी लोकसंगीतावर आधारित होती. संगीतकार भूपेन हजारिका यांनी संगीतबद्ध केली होती. दीदींचा आर्त स्वर आणि आतील हाक डिम्पलच्या अभिनयाला तारुन गेली, हे कसे विसरता येईल. याचप्रमाणे नुरीमध्ये पूनम ढिल्लो हिला सुद्धा ‘आ जा रे दिलबर आजा’ हे गाणे प्रसिद्धी देऊन गेले. 


नव्या पिढीत हम आपके है कौन आणि मैंने प्यार किया या दोन्ही चित्रपटांनी माधुरी दीक्षित आणि भाग्यश्री या मराठी नायिकांना यशाचा मार्ग मोकळा करून दिला. ‘दीदी तेरा देवर दिवाना...’, ‘बडा दुख देना तेरे लखन...’ या गाण्यांनी माधुरी दीक्षितच्या यशाचा मार्ग मोकळा केला होता. श्रीदेवीला सुद्धा त्यापासून दूर ठेवता येणार नाही़ हिम्मतवाला, चांदनी, नगिना, लम्हे यातून श्रीदेवीला मोठे नाव मिळाले. नाचे मयुरीमधील सुधा चंद्रन यांच्या अभिनयाला दीदींच्या गाण्यांची साथ मिळाली आणि त्या रातोरात स्टार बनल्या. ‘पत्थर के फुल’ मधील रामलक्ष्मण यांच्या गाण्यांनी दीदींनी रविना टंडनला रस्ता मिळवून दिला.


अन्य एक मराठमोळी पद्मिनी कोल्हापूरे यांच्या बाबतही हेच म्हणता येईल़ बालकलावंत पद्मिनी यांना ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ मधील ‘यशोमती मैया से...’ या गाण्याने अभिनय प्रवासाचा मार्ग मोकळा केला. प्रेमरोगमधील ‘ये गलिया ये चौबारा...’ आणि ‘प्यार झुकता नही...’मधील गाणी पद्मिनी कोल्हापूरे यांच्या यशातील पायरी बनली. ‘सौतन’ मधील ‘ जिंदगी प्यार का गीत है...’ हे गाणे पद्मिनी यांना तर ‘शायद मेरी शादी का खयाल...’ गाण्याने टीना मुनिमला यशावर पोहोचवले. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दिल तो पागल है, दिल से, मोहब्बते या चित्रपटांतून दीदींनी काजल, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, ऐश्वर्या राय या नव्या पिढीतील नायिकांना आपला स्वर दिला आणि त्यांनाही यश मिळवून दिले. 


दीदींनी त्याग आणि समर्पणातून संगीत देवीची उपासना केली. त्यांना शतश: शतश: प्रणाम!


संजय मुंदलकर गीतकार

(छायाचित्र : साभार)



No comments:

Post a Comment