Saturday, 20 August 2022

समाजद्रोहींकडूनच अपघात

वाहन उत्पादक  कंपन्यांनी ग्राहकांवर अधिक भार टाकत मासिक हप्त्यांनी सवलत दिल्याच्या दिवसांपासून आजतागत हा प्रकार सुरूच आहे. त्यावर आता तरी अंकुश बसणे अगदी काळाची गरज होऊन बसली आहे. रस्ते  आहेत तेवढेच आहेत आणि वाहतूक नियमांबाबतची बेफिकीरी वाढत आहे.


मृत्यू हा शाश्वत आणि सत्य. संपूर्ण जीवनमात्र त्याला स्वीकारतात ; परंतु सर्व काही सुरळीत सुरू असताना कुणाच्या तरी चुकीने आयुष्याचा अंत होतो़ ही बाब स्वीकारण्याजोगी नाहीच़ सध्या मानवजात नको तितकी ‘फास्ट’झाली आहे़ सर्व गोष्टी चुटक्यासरशी व्हाव्यात अशी ज्याची त्याची उपेक्षा असते आणि त्यासाठी त्याची कोणत्याही परिणामाला सामोरे जाण्याची तयारी असते. मग निसर्गनिर्मित असो वा मानवनिर्मित असो नियमांना पायदळी तुडविणे, हे फार शहाणपणाचे समजले जाते. त्यात प्राण गेला तरी बेहत्तर! असंच काहीसं सध्या होत आहे़ वाहनातून इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी हा मानव पार नियम तोडत आहे आणि पदरी मात्र अपघाती मृत्यू ओढवून घेतोय. 

देशातील प्रत्येक मार्गावर अपघात होत आहेत़  रस्ता एकपदरी असो वा सहापदरी कोणताही जीव त्यावर सुरक्षित नाही़ कोणताही चांगला मार्ग वाहनांच्या सुरक्षित वेग ासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यासाठी असला तरी सुरक्षिततेचा हेतू कधीच मागे पडला आहे. यापैकी अतिवेगाचा हेतू तर साध्य झाला;परंतु सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा (वाहतुकीचा) हेतू साध्य झालेला आहे, असे ठाम सांगता येणार नाही. कारण रस्तोरस्ती अजूनही अपघातांची मालिका आहे.  भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहेच़भरीसभर चार वा सहापदरी अशा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरही असे अपघात वारंवार व्हावेत, हे मोठे दुर्दैवच म्हटले पाहिजे.

  अपघातांच्या मागे केवळ रस्ते हे एकमेव कारण नसल्याचे अनेकदा आढळून आले आहे. मानवी चुकाही अपघातास कारणीभूत ठरत आहेत. रस्ता कितीही सुरक्षित असला तरी तेवढे पुरेसे नाही. रस्त्यावरून जाणाºया वाहनांमध्ये किती प्रवासी (वा माल) कोंबावेत, वाहनचालकाने सलग किती तास ‘ड्रायव्हिंग’ करावी आणि वाहनाचा वेग किती असावा यावर सरकारने लक्ष ठेवावे,असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल.म्हणजेच अपघातांना इतर कारणांपेक्षा मानवी चुका अधिक कारणीभूत असल्याचे लक्षात येते. या चुकांची साखळी वाहतुकीची परवाने देण्यापासून सुरू होते, तिथून ती अतिवेगाने वाहने चालवण्याची प्रवृत्तीपर्यंत संपते. 

अगदी  बनावट परवाधारक चालकापासून वळणावर वाहन असताना मोबाईलवर बोलण्यापर्यंतची साखळी अपघाताला कारणीभूत ठरली आहे़ आज अशी स्थिती आहे की  परवाना असलेला चालक अ सो वा नसलेला चालक असो, दोघांनाही अन्य कुणाच्या जीवांची पर्वा नाही़ मोबाईल कानाशी ठेवत  वाहन चालवणारे समाजद्रोही अनेकदा पाहावयास मिळतात. ते  कदापिही वाहतुकीच्या नियमांबाबत दक्ष नसतात. वेगाची मर्यादा न पाळणे, भरधाव गाडी ‘लेन’ तोडून दुसºया ‘लेन’मध्ये घेणे अशा प्रकारातून ते अपघातास कारणीभूत ठरतात. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना मानवी चुकांमुळे झालेल्या आहेत. भारतात रस्ते अपघातात मरणाºयांची संख्या मोठी आहे आणि त्यावरून भारतीय किती बेशस्त आहेत, यावर प्रकाश पडत असतो. या बेशिस्तीमध्ये बेफाम वेगाने गाड्या चालवणे,‘ओव्हरटेक’ करण्याची चुकीची पद्धत आदी बाबी प्रामुख्याने आढळतात.अनेकदा प्रवासीही चालकाला गाडी वेगाने चालवण्याबाबत प्रोत्साहित करत असतात. अशाप्रकारामुळे वेगाची ‘झिंग’ पूर्ण होत असली तरी हा आपल्या आणि वाहकाच्या जीवाशी खेळ असतो, ही जाणीव त्यांना नसते. भारतात वाहनांची संख्या वाढत आहे.  (वाहन उत्पादक  कंपन्यांनी ग्राहकांवर अधिक भार टाकत मासिक हप्त्यांनी सवलत दिल्याच्या दिवसांपासून आजतागत हा प्रकार सुरूच आहे. त्यावर आता तरी अंकुश बसणे अगदी काळाची गरज होऊन बसली आहे.) मात्र, रस्ते  आहेत  तेवढेच आहेत आणि वाहतूक नियमांबाबतची बेफिकीरी वाढत आहे. त्यामुळे  ‘सुरक्षित वाहतूक’ हे  आव्हान  समाजासमोर दिवसांगणिक बिकट  होत  चालले  आहे. कारण दुर्घटनांचा बळी हाच समाज ठरत आहे.

संजय मुंदलकर (सर्वाधिकार सुरक्षित) 

Friday, 12 August 2022

शब्दांना फुटले भाले ...

 यंदाच्या १५ आॅगस्ट  रोजी भारतीय स्वातंत्र्याने सुमारे ७५ वर्षे पूर्ण केलेली असतील़ आणि म्हणून देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार आहे. घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार असून, स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष स्मरणीय ठरावे, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने संपूर्ण देश एक होणार असून, सर्वांचा सहभाग अभिप्रेत आहे. एकत्वाची ही भावना  भविष्यासाठी प्रेरणादायी  ठरेल, हे निश्चित!


भारताला गतवैभवाचा आणि स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली परंपरा आणि इतिहास आहे. स्वातंत्र्यातील आनंद अनुभवताना पारतंत्र्याची बंधने झुगारून देत ज्यांनी या लढ्याला सशक्त   केले आणि त्यासाठी घरदारावर तुळशीपत्र ठेवले अशा असंख्य अनाम वीरांप्रति देशवासियांच्या मनात अभिमानाची भावना सातत्याने तेवत आहे. त्यांचा त्याग हा आपल्या प्रगतीचा जसा आधार आहे, तशी ती देशाला यशाच्या मार्गावर पुढे नेणारी प्रेरणादायी बाब आहे. 

देशाने मागील ७५ वर्षांच्या काळात विविध सरकार सत्तेत आली आणि देशाला विकासाच्या दिशेने चालत ठेवले़ या  मोठ्या कालावधीत  केलेली नेत्रदीपक प्रगती आपल्यासमोर आणि संपूर्ण जगासमोर आहे. आज  देश विज्ञान, तंत्रज्ञान, कला, कृषी, क्रीडा, शिक्षण, पायाभूत सुविधा, आरोग्य, अंतराळ, संरक्षण आदी विविध क्षेत्रात पुढे पुढे जात आहे. भारताने नव्या आणि उमेदीच्या काळात रस्त्यांचे जाळे विणत असतानाच रेल्वेमार्गाला प्राधान्य दिले. विमानाद्वारे सीमाही ओलांडल्या. शेतीला प्राधान्य देत असतानाच उद्योगांतून धूर सोडला. आणि सोबत विज्ञानही ठेवले. आजच्या घडीला आपल्यासोबत अन्य देशांनाही विकासाच्या दिशा दाखवत आहे. आणि जगाचे नेतृत्व करण्याची पात्रता आपल्या अंगी बाळगण्याचा दुर्दम्य आशावाद ठेवत आहे. या वाटेवरून आणखी उत्तुंग यशाकडे जाताना मागे  वळून  स्वातंत्र्य सैनिकांप्रति सन्मानाची भावना मनात राहणे हे सुद्धा देशगौरवासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. या निमित्ताने शाळा-महाविद्यालयांतून, विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांचे कार्य नव्या पिढीपर्यंत  पोहोचणे अपेक्षित आहेत आणि त्यादृष्टीने उपक्रमही आयोजित करण्यात येत आहेत.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या त्या दिवसांत शब्दांना भाले फुटले होते. ती शस्त्रांसारखी पाजळून निघाली होती, तर मौनांनाही शब्दांचे स्वरूप मिळाले होते. वंदे  मातरम् किंवा चले जाव या दोन शब्दांतून ठिगणी नव्हे,आग नव्हे तर वणवा भडकला होता. शब्दांची मर्यादा आणि त्याची प्राबल्य  काय असते, याचा प्रत्यय त्या काळात अनुभवास येत होता. तर, राष्ट्रपिता महात्मा गांधींनी मौनातून इंग्लिश सत्तेचा निषेध व्यक्त  केलेला. त्याच धर्तीवर तिरंगा हे सुद्धा एक प्रतिक... देशभक्तीचे, देशप्रेमाचे, समतेचे, एकतेचे, कर्तव्याचे आणि निष्ठेचेही.

तिरंगा ध्वजामागे राष्ट्रप्रेमाची, गौरवाची, अभिमानाची भावना आहे.  सीमेवर लढणारा जवानही तिरंग्यासाठी प्राण देण्यास तयार असतो. अंतराळात जाणाºया यानावर असलेला तिरंगा आपल्या मनात अभिमान निर्माण करतो. अशा  या आपल्या  तिरंगा  ध्वजाप्रति भावना व्यक्त करताना त्याचा सन्मान राखला जाईल याची दक्षतादेखील घ्यावी लागणार आहे.

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने  सरकारने  ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम सुरू केला आहे.  या माध्यमातून तिरंग्याप्रति, भारतीय स्वातंत्र्याप्रति असलेली भावना घराघरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशाच्या पुढील यशाची आणि गौरवाची पायाभरणी करणारा ठरावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी देशप्रेमाची ही ज्योत  मनात  सतत  तेवत आणि प्रज्वल ठेवावी लागणार आहे. आपली प्रत्येक सकारात्मक  कृती देशाच्या राष्ट्रध्वजाचा गौरव अधिक वाढवणारी ठरणार आहे. 

Sunday, 24 July 2022

अपघात टाळता येत नाही का?

 देशभरात आज दोन भीषण रस्ते अपघात झालेत. महाराष्ट्र आणि शेजारच्या मध्य प्रदेशात. आणि एकूण १९ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिकस्तरावर सांगण्यात येत आहे. (यात बालकांचाही समावेश आहे)

मध्य प्रदेशातील इंदूरहून अमळनेरच्या दिशेने जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस धार जिल्ह्यातील खलघाट पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. आज सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

दुसरा अपघात अमरावती जिल्ह्यात परतवाडा- बैतुल (मध्य प्रदेश) मार्गावरील निंभोरा फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. रविवारी रात्री उशिरा किंवा मध्यरात्रीनंतर दुचाकी आणि कार वाहनाच्या या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला आहे, तर एकजण जखमी आहे मृतांमध्ये बोदड,खरपी, बहिरम येथील नागरिकांचा समावेश असल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. दुचाकी आणि कारच्या अपघातात सहा जणांना जीव गमवावा लागला. अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह गाडीमध्ये अडकून होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

वरील दोन्ही घटनांत पावसाचा नक्कीच संबंध आहे. असे असले यात मानवी चुकांच मानता येईल. कारण कोणत्याही रस्ते पुलावरून वाहनाचा वेग कमी असावा, असा नियम आहे आणि ही बाब त्या बसचालकाला माहिती असावीच. त्यामुळे ही बस नक्कीच वेगात असावी. अन्यथा पुलावरील कठडा बुडापासून तुटला नसता.
दुसरे असे, की हा कठडा पूर्ण तुटला आहे. त्यामुळे त्याचे बांधकाम कच्चे होते, हे सिद्ध आहे.

अमरावती झालेल्या घटनेतही वेग कारणीभूत असू शकतो. अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह गाडीमध्ये अडकून पडणे आणि सकाळपर्यंत कुणालाच त्याबाबत न कळणे, यावरून दोन्ही वाहनांची मोठी धडक झाली असावी. जो कुणी जखमी असेल, त्यालाही अन्य कुणाशी संपर्क आलेला नाही, यावरून तोही गंभीर असावा.

सध्या पावसाचे दिवस आहेत. पाण्यामुळे रस्ते निसरडे होतात. रस्त्यात खड्डे असतील, तर त्याचा अंदाज येत नाही. तरीही वेगाचा हव्यास धरून मृत्यूपर्यंत पोहोचण्यास माणसाला घाई झालेली असते, असेच म्हणावे लागेल.

अनेकदा आपले वाहन अन्य वाहनावर धडकणार (अर्थात दिवसाच्या उजेडात) आहे, हे आपल्याला त्या अगोदर काही सेकंद कळलेले असते;परंतु ती घटना / अपघात का कुणास टाळता येत नाही. प्रामुख्याने ही बाब चालकाच्या मानसिकतेवर अवलंबून असते आणि न होणारी घटना होऊन जाते. याशिवाय अशावेळी संबंधित व्यक्ती वा वाहनातील इतरांना जोरदार मानसिक धक्का बसून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. (कारण अपघात म्हणजेच मृत्यू, ही मानवाची मानसिकता झालेली




आहे.) आणि किरकोळ वा गंभीर जखमा होऊन मृत्युमुखी पडतो. ही शक्यता बहुतांश वेळा नाकारता येत नाही. या संदर्भात एक बातमी वाचण्यात आली होती, की एका चारचाकी वाहनातील महिलेला अपघात पुढ्यात दिसत होता़ बचावाची कोणतीही स्थिती नसताना तिने आपले बाळ तत्काळ वाहनाबाहेर टाकले. घटनेत तिचा मृत्यू झाला;परंतु बाळ वाचले. सांगायचे असे की वाहनचालक वा अन्य व्यक्ती तत्कालिन काय निर्णय घेतात, त्यावरही अवलंबून असते.

संजय इस्तारी मुंदलकर

Monday, 28 March 2022

फक्त आणि फक्त वेशभूषातून अभिनय जगला ‘हा’ अभिनेता आणि गाठली मोठी उंची...

तळागाळातील माणसांसाठी कळवळा असणारा, अडल्या- नडल्याला सढळ हस्ते मदत करणारा, डॉ. राममोहन लोहियांबद्दल प्रचंड आदर असणारा, निर्मात्याला पैशांसाठी कधीही न नडणारा, असा हा ‘सज्जन खलनायक’ होता. सन २०१३ मध्ये अमेरिकेतील अनियतकालिकाच्या भारतीय एका आवृत्तीने हिंदी चित्रपटक्षेत्रातील २५ महान अभिनेत्यांची यादी तयार केली, त्यात निळू फुले यांचा समावेश होता.


डोक्यावर कडक तिरपी गांधी टोपी, अंगामध्ये  पांढरा झब्बा, काळे जाकिट, पांढरे शुभ्र धोतर, एका हाताने वर उचललेला सोगा,  पायात  कोल्हापुरी चपला, ओठावर मिशी, रस्त्यावरून चालताना व्यक्त केलेला मस्तवालपणा, अधून मधून तोंडातील तंबाखूची मारलेली पिचकारी, अशी एकूण वेषभूषा निळू फुले यांची राहायची़ ही काहीशी ठरलेली असायची, असेही म्हणता येईल़ कधीतरी ती कथानकानुसार ती बदलत जायची; परंतु खलनायकाचा सार त्यांच्या वेशभूषेतून समजून येत असे़ आणि निळू फुलेंच्या अभिनयाचे हेच यश होते. चेहºयावरील हावभाव, देहबोली आणि वेशभूषा यांतून अभिनयाने उंची कधीचीच गाठलेली असायची, संवाद तर दूरच राहिले. अशा आवेशात निळूभाऊंनी तब्बल २५० चित्रपट अभिनयाने परिपूर्ण केले. 




नीळकंठ कृष्णाजी फुले आणि नंतरच्या काळात फक्त निळू फुले़ ४ एप्रिल १९३० रोजी पुण्यात महात्मा जोतिबा फुले यांचा वारसा सांगणाºया घराण्यात त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यसैनिक म्हणून चळवळीत भाग घेतला. राष्ट्रीय सेवादलाची बांधिलकी आयुष्यभर मानली. वयाच्या सतराव्या वर्षी आर्मी फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये ८० रुपये पगारावर काम करतानासुद्धा दरमहा १० रुपये निळूभाऊ राष्ट्र सेवा दलाच्या व्यवस्थापनाला देत असे. पुस्तकांच्या वाचनाच्या छंदातून ते वगनाट्य, लोकनाट्याकडे वळले.


१९५७ मधील लोकसभा निवडणुकीच्या दिवसांत निळंूनी ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ नावाचे लोकनाट्य  लिहिले आणि ते तुफान गाजले. नंतरच्या काळात ‘कथा अकलेच्या कांद्याची’ चे दोन हजारांवर प्रयोग झाले. हा अभिनय बघून दिग्दर्शक अनंत  माने  यांनी निळूभाऊंना १९६८ मध्ये ‘एक गाव बारा भानगडी’मध्ये ‘झेल्या पाटील’ त्यांच्यावर सोपवला आणि येथूनच गावाकडचा अस्सल खलनायक (VILEN) जन्माला आला. त्यांचे कर्तृत्व आणि प्रसिद्धी, लोकप्रियता  अनेकांनी अनुभवली आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या पहिल्या चित्रपटात अर्थात ‘सारांश’ मध्ये निळूभाऊंनी सत्तांध राजकारण्याची खलनायकी भूमिका केली होती. यातील एक दृश्य आठवा...अनुपम आपली पेर्इंग गेस्ट सुजाता हिला निळूंच्या घरी येऊन त्यांच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचे सांगतात. यावेळी निळूंनी जागवलेला अभिनय पहा़ आपल्याला चक्क निळूंचा संताप येतो; परंतु ते त्यांच्या अभिनयाचे यश असते. याचवेळी भिंगरीतील निळू डोळ्यांसमोर आणा. आपल्यातील प्रेक्षक शांत होतो. असेच काहीसे मशाल, कुली ( भूमिका नथू मामा), वो सात दिन, सिंहासन, पिंजरा मोहरे अशा हिंदी-मराठी चित्रपटांविषयी सांगता येईल. 


दोन ध्रुवांचा अभिनय

‘सिंहासन’मधील मूक प्रेक्षक बनलेला पत्रकार, सत्तेच्या खेळामधील जीवघेण्या चाली बघून वेडा होणारा आणि सहकाराच्या चळवळीतून ओसाड रानामध्ये द्राक्षाचे बगिचे फुलवणारा ‘सामना’मधील सरपंच भाऊंनी  ताकदीने केला. मुक्काम पोस्ट ढेबेवाडीमधील दरोडेखोर, पिंजरामधील नाच्या (१९७३),या तर दोन ध्रुवावरील भूमिका. चोरीचा मामलामधील ललिता पवारबरोबरचा हातगाडीवालाही अविस्मरणीय ठरला. 


सन १९७३ ते ७५ अशी लागोपाठ तीन वर्षे त्यांना राज्य शासनाचे अभिनयाचे पारितोषिक मिळाले. यात हात लावीन तिथे सोने, सामना आणि चोरीचा मामला या चित्रपटांतील  अभिनयाची दखल घेण्यात आली होती. १९९१ मध्ये संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक आणि ‘कला गौरव’सारखे अनेक पुरस्कार त्यांच्या नावे जमा झाले. केसरी मराठा ट्रस्ट, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पुणे शाखा) कडून त्यांचा सन्मान करण्यात आला. 

असा निळू कलावंत अचानक १३ जुलै २००९ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी आयुष्याच्या पडद्यावरून नाहीसे झाला. आता त्यांच्या उत्तुंग अभिनयाचा वारसा त्यांची कन्या गार्गी फुले थत्ते चालवत आहेत.


लेखन

संजय इस्तारी मुुंदलकर


सर्वाधिकार सुरक्षित

(लेखातील छायाचित्र गुगलवरून साभार)

 

Saturday, 26 February 2022

अभ्यास आणि झोप

नवे वर्ष आले की आपल्या सर्वांचे डोळे परीक्षांकडे लागलेले असते. परीक्षा कोणत्याही वर्गाची असली तरी अख्खे कुटुंब परीक्षार्थी बनलेले असतात. त्यात दहावी वा बारावीची परीक्षा म्हटली की उत्सुकतासोबतच घाईगडबड आणि काहीसा तणाव सुद्धा अनेक कुटुंबात दिसून येतो. इयत्ता नववीखालील परीक्षा साधारण: एप्रिलमध्ये असतात़ दहावी-बारावी मात्र फेब्रुवारी,मार्च महिन्यात असल्याने अनेक विद्यार्थी रात्री उशिरा जागरण न करता सकाळी उठून अभ्यास करत असतात. मात्र, यावेळी काहीशी थंडी असल्यामुळे पहाटे उठून अभ्यास करताना झोप येते. विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी आणि झोपण्यातच जास्त वेळ जातो. या सगळ्यांचा परिणाम अभ्यास आणि निकालावर होत असतो. मात्र, पहाटे अभ्यासाच्या वेळी काही गोष्टी पाळल्यास झोप दूर पळवता येऊ शकते.



सकाळी उठल्यानंतर अनेक विद्यार्थी केवळ ‘स्टडी लॅम्प’च्या प्रकाशात अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. एक ठराविक जागा वगळता बाकीची खोली जवळजवळ अंधारातच राहते. या कमी प्रकाशात आणि शांत वातावरणात झोप लागणे स्वाभाविक आहे. अशा वेळी अभ्यासाच्या ठिकाणी प्रकाश मोठा ठेवल्यास झोप टाळता येते.


अनेकजण सकाळी उठल्यानंतर बिछाना अर्थातच बेडवर बसून अभ्यासाला सुरुवात करतात. मित्रांनो, यातून एक तर आळशीपणा येऊ शकतो किंवा झोपून हळूहळू वाचन सुरू केल्यास झोप येते. त्यामुळे अभ्यास करताना नेहमी खुर्चीवर किंवा भींतीला पाठ सरळ करून बसावे. समोर टेबल ठेवावा. पुस्तक मांडीवर न ठेवता समोरच्या टेबलवर असावे. बसण्याच्या स्थितीतही काही वेळाने हात किंवा पाय हलवत राहावे.


अभ्यासादरम्यान काही वेळाने पाणी प्यावे. हे आरोग्यासाठीच फायदेशीर ठरेल. यामुळे वारंवार उठून शौचालयात जावे लागले तरी ज्यामुळे शरीरातील निष्क्रियता कमी होण्यास मदत होते.


परीक्षेच्या काळात रात्री उशिरापर्यंत अभ्यास केल्यास सकाळी जागे होणे कठीण असते. थकलेल्या मनाने अभ्यास केला की पुन्हा पुन्हा झोप येते. अशावेळी चेहºयावर पाणी शिंपडावे. आळस दूर होतो आणि अभ्यास करण्यासाठी मन नव्याने सक्रिय होते.


अभ्यास करताना वरील काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे.


बेस्ट लक...


संजय मुंदलकर

शिक्षण अभ्यासक

Wednesday, 9 February 2022

लता दीदींच्या ‘गांधर्व स्वरा’नेच चित्रपटांतील नायिकांना दिली प्रसिद्धी

लता दीदींनी गायिलेल्या गाण्यांतूनच भारतीय चित्रपटांतील नायिकांना फार मोठ्या प्रसिद्धीचे वलय, यश आणि वारेमाप पैसा मिळाला, ही बाब दुर्लक्षून आणि नाकारून कदापिही चालणार नाही. अनेकदा कथा दमदार वा अभिनय कसदार नसतानाही केवळ गाण्याने प्रसिद्धी मिळाल्याचा अनुभव देशातील हिंदी चित्रपटक्षेत्राने घेतला आहे़ दीदींच्या स्वरांनी कित्येक नायिकांच्या अभिनय प्रवासाचा मार्ग मोकळा केला, त्यांच्या यशाचा जो कळस उभा राहिला त्याचा पाया बनण्याचे महत्कार्य केले. जुन्या-नव्या पिढीतील नायिकांना आपला स्वर दिला आणि त्यांनाही यश मिळवून दिले. या नायिकांच्या कारकिर्दीत मैलाची दगड ठरलेली काही गाणी केवळ दीदींनीच दिली.






संगीत आणि गायनासाठी आपले सारे आयुष्य पणाला लावणाºया एकमेव म्हणजे लता दीदी मंगेशकर. दीदींनी अनेक विक्रम रचले. त्यांच्या ताना, हरकती आणि आवाजाची कोणालाही सर नाही आणि पुढेही नसेल. प्रत्येक गाण्यात त्या खरोखरच जीव ओतत होत्या. कधी गाण्यातून ममता दिसली, कधी एका प्रेयसीची प्रीती, कधी अल्लडपणा, कधी कारुण्य, कधी त्याच आवाजातून पराक्रमाची गाथा कानी आली. उस्ताद अमानत अली खान, अमानत खान देवासवाले, पंडित तुलसीदास शर्मा ही लता दीदींचे गुरू होते. याशिवाय त्यांनी संगीतकार अनिल बिस्वास यांच्याकडूनही प्रशिक्षण घेतले. 

कैक पिढ्यांसाठी लता दीदींचा आवाज म्हणजे एक संस्कार होता...आणि याच संस्कारातून भारतीय चित्रपटांतील कलाकारांना विशेषत: नायिकांना ओळख मिळाली. यात अभिनयाचा अधिक वाटा असला तरी लता दीदींनी गायिलेल्या गाण्यांतूनच भारतीय चित्रपटांतील नायिकांना फार मोठ्या प्रसिद्धीचे वलय, यश आणि वारेमाप पैसा मिळाला, ही बाब दुर्लक्षून आणि नाकारून कदापिही चालणार नाही. अनेकदा कथा दमदार वा अभिनय कसदार नसतानाही केवळ गाण्याने प्रसिद्धी मिळाल्याचा अनुभव देशातील हिंदी चित्रपटक्षेत्राने घेतला आहे़ विशेषत: नव्वदच्या दशकातील अनेक चित्रपटांबाबत बोलता येईल.


लता दीदींनी भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रत्येक संगीतकार आणि गायकासोबत गाणे गायिले आहे. याबाबत त्या पहिल्या गायिका ठरल्या आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. दीदींनी देशातील प्रत्येक नायिकाला ओळख दिली़ अगदी १९४९ पासून तर आजतागतच्या अर्थात दोन हजार सालातील आजपर्यंतच्या कालावधीतील नायिकांना त्यांनी आपल्या स्वराने प्रसिद्धी मिळवून दिली. अगदी नर्गिस, मधुबाला, वहिदा रहमान, माला सिन्हा, हेमामालिनी, स्मिता पाटील, परवीन बाबी, झिनत अमान, रेखा, जया भादुरी, मीनाक्षी शेषाद्री, काजल, माधुरी दीक्षित, भाग्यश्री, राणी मुखर्जी या प्रत्येक पिढीतील नायिकांना दीदींनी आपला आवाज दिला़ तांत्रिकदृष्ट्या प्रत्येक गाण्याच्या छायाचित्रणात नायिका गाणे (आपले ओठ हलवत) गात असली तरी त्यामागे स्वर होता लता दीदींचा! ही गाणी सर्वसामान्य रसिकांंच्या ओठांवर रुळल्याने चित्रपटांतील नायिकांना पुढील चित्रपटांचा मार्ग मोकळा होत गेला.


‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे गाणे निर्माता दिग्दर्शक अभिनेते राज कपूर यांच्या बरसात चित्रपटातील. यातील स्त्रीस्वर मात्र लता दीदींचा होता आणि ते गाणे लोकप्रिय ठरले़ अर्थात नायिका नर्गिस यांना त्याचा फायदा झाला. ‘आयेगा आनेवाला’ हे महलमधील रहस्यमय,रोमांचित करणारे गाणे मधुबाला यांच्यावर चित्रित करण्यात आले़ या गाण्याला फार मोठे यश मिळाले, तसेही नायिका मधुबाला यांनाही!


वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित मधुमतीमधील ‘आजा रे मै तो..’ या सारखी अनेक गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. ‘इन्ही लोगो ने...’, ‘मौसम है आशिकाना...’ पाकिजामधील गाण्यांबद्दलही हेच बोलता येईल. लता दीदींचा स्वर आणि मीनाकुमारी यांचे पदलालित्य यांची सरमिसळ होऊन त्याचा फायदा नायिकेलाच झाला. 


‘आ जाने जा...’ हे हेलन यांच्यावर चित्रित केलेले गाणे. इन्तकाममध्ये त्या नायिका नव्हत्या;परंतु दीदींच्या आवाजातील गाण्याने हेलन यांना लोकप्रिय केले. याच धर्तीवर समाधी चित्रपटातील ‘बंगले के पिछे...’ या गाण्याबद्दल बोलता येईल़ आशा पारेख यांना ओळख मिळवून देण्यात दीदींच्या या गाण्याचा महत्त्वाचा वाटा होता. ‘शर्मिली’ तील ‘खिलते है गुल यहाँ...’ने राखी यांना यश दिले. माला सिन्हा, हेमा मालिनी, रेखा, जया भादुरी यांच्याबद्दल हेच बोलता येईल. 


‘तेरे बिना जिंदगी से कोई सिकवा नही...’ या गाण्याने दीदींनी सुचित्रा सेन यांना प्रसिद्धीच्या झोकात आणले. ‘आ जा आयी बहार...’ मधून नायिका साधना यांना मोठे यश मिळाले. ‘एक प्यार का नगमा है...’ यातून नंदा यांना फायदाच मिळाला. नंतरच्या काळात डिम्पल यांना ‘हम तुम एक कमरे में बंद हो...’ या गाण्यातून दीदींचा अल्लड स्वर नायिकेलाही अनुभवता आला. शबाना यांना ‘हजार राहे मुडके देखी...’ या आणि अन्य गाण्यांतून मोठी प्रसिद्धी मिळाली. हेमामालिनी यांना ‘जिंदगी की ना टुटे लडी...’ नितीन मुकेश यांच्यासोबतच्या गाण्याने यशाचा मार्ग मोकळा झाला. नौशाद यांच्या संगीत निर्देशनातील ‘ऐ दिल ए नादान...’ या गाण्याबाबतही हेच बोलता येईल. मेरे नशीब में तू है के नही, ये मुलाकात एक बहाना या गाण्यांनी हेमा यांना स्वप्नसुंदरी होण्यास बाध्य केले, हे कसे नाकारता येईल.‘काँटो से खिचके ये आँचल...’ हे गाणे वहिदा रहमान यांच्यासाठी बनले होते की काय, असे नकळत वाटून जाते. ‘आशा’ मधील ‘शीशा हो या दिल हो...’ ने रिना रॉय यांना यशाची गोडी दिली. ‘रोटी, कपडा और मकान’ मधील ‘मैं ना भुलूंगा...’ने झिनत अमान यशाची पायरी चढल्या. 


१९८१ मधील ‘एक दुजे के लिये’ मधील ‘सोलह बरस की...’ या गाण्याने तर रती अग्निहोत्रीला रातोरात स्टारच्या रांगेत बसवले. ‘सिलसिला’ मधील ‘देखा एक ख्वाब तो...’ ने रेखाच्या यशात भरच टाकली. १९८५ मध्ये ‘राम तेरी गंगा मैली’ मधील सर्व गाणी मंदाकिनीच्या मोठ्या यशात सहभागी होती.


‘यारा सिली विरह का...’ आणि ‘दिल हूम हूम करे...’ या अनुक्रमे लेकीन आणि रुदालीमधून डिम्पल कपाडिया यांना नवी ओळख मिळाली. ही दोन्ही गाणी लोकसंगीतावर आधारित होती. संगीतकार भूपेन हजारिका यांनी संगीतबद्ध केली होती. दीदींचा आर्त स्वर आणि आतील हाक डिम्पलच्या अभिनयाला तारुन गेली, हे कसे विसरता येईल. याचप्रमाणे नुरीमध्ये पूनम ढिल्लो हिला सुद्धा ‘आ जा रे दिलबर आजा’ हे गाणे प्रसिद्धी देऊन गेले. 


नव्या पिढीत हम आपके है कौन आणि मैंने प्यार किया या दोन्ही चित्रपटांनी माधुरी दीक्षित आणि भाग्यश्री या मराठी नायिकांना यशाचा मार्ग मोकळा करून दिला. ‘दीदी तेरा देवर दिवाना...’, ‘बडा दुख देना तेरे लखन...’ या गाण्यांनी माधुरी दीक्षितच्या यशाचा मार्ग मोकळा केला होता. श्रीदेवीला सुद्धा त्यापासून दूर ठेवता येणार नाही़ हिम्मतवाला, चांदनी, नगिना, लम्हे यातून श्रीदेवीला मोठे नाव मिळाले. नाचे मयुरीमधील सुधा चंद्रन यांच्या अभिनयाला दीदींच्या गाण्यांची साथ मिळाली आणि त्या रातोरात स्टार बनल्या. ‘पत्थर के फुल’ मधील रामलक्ष्मण यांच्या गाण्यांनी दीदींनी रविना टंडनला रस्ता मिळवून दिला.


अन्य एक मराठमोळी पद्मिनी कोल्हापूरे यांच्या बाबतही हेच म्हणता येईल़ बालकलावंत पद्मिनी यांना ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ मधील ‘यशोमती मैया से...’ या गाण्याने अभिनय प्रवासाचा मार्ग मोकळा केला. प्रेमरोगमधील ‘ये गलिया ये चौबारा...’ आणि ‘प्यार झुकता नही...’मधील गाणी पद्मिनी कोल्हापूरे यांच्या यशातील पायरी बनली. ‘सौतन’ मधील ‘ जिंदगी प्यार का गीत है...’ हे गाणे पद्मिनी यांना तर ‘शायद मेरी शादी का खयाल...’ गाण्याने टीना मुनिमला यशावर पोहोचवले. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दिल तो पागल है, दिल से, मोहब्बते या चित्रपटांतून दीदींनी काजल, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, ऐश्वर्या राय या नव्या पिढीतील नायिकांना आपला स्वर दिला आणि त्यांनाही यश मिळवून दिले. 


दीदींनी त्याग आणि समर्पणातून संगीत देवीची उपासना केली. त्यांना शतश: शतश: प्रणाम!


संजय मुंदलकर गीतकार

(छायाचित्र : साभार)



Tuesday, 1 February 2022

...आणि यात पालकच हरला

दोन तासांची उत्तरपत्रिका अर्ध्या तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण केली जाते, यात त्यांच्या आकलनशक्तीचा वा बुद्धीचा वापर कसा होणार? अशा परीक्षाला आणि त्यातून मिळणाºया प्रमाणपत्राला भविष्यकाळात काय किंमत असेल हाही एक चिंतेचा विषय आहे. 

काल सोमवारी राज्यातील काही शहरात घडवून आणलेल्या  कथित आंदालनात विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तो प्रकार कुणी आणि कसा अंमलात आणला यावर पोलिस हाय-टेक तपास करत आहेत. काहींना अटक करण्यात आली आहे; परंतु मूळ प्रश्न कायम आहे. हाताशी आलेल्या तंत्रज्ञानातून या विद्यार्थ्यांनी जसे आॅनलाईन शिक्षण घेतले, त्याच तंत्रज्ञानाने त्यांना शाळेच्याच बसवर दगडफेक करण्यास बाध्य केले.


इयत्ता बारावीसह दहावीच्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मग बारावीचा विद्यार्थी आपल्या घरात वा अभ्यासिकेत अभ्यासात व्यस्त असणे साहजिक होते़ त्याला पालकांनी वा मातापित्यांनी बाहेर कसे काय पडू दिले. याशिवाय कोरोना नियमांचेही बंधन होते़ तरीही त्यांनी जुमानले नाही़ नागपुरात जो काही प्रकार घडला, यात गरिबांचीही मुले होती़ मध्यमवर्गीयांचीही आणि श्रीमंत घरातीलही होती. झोपडपट्टीतील होती. एका चाळीतील वा डुप्लेक्समध्ये राहणारी होती. अशाप्रकारच्या कथित भडकावू आंदोलनात काही बरेवाईट झाले असते तर सर्वाधिक नुकसान कुणाचे झाले असते, हा विचार त्यांच्या पालकांनी केला नसावा काय? आणि मुळात आपल्या सतरा-अठरा वर्षांच्या मुलाचे वय आंदोलन करण्याचे वा त्यात सहभागी होण्याचे नाही, हे त्यांच्या माता पित्यांना समजले नसावे काय? 


राज्यात आॅनलाईन परीक्षाच्या मागणीसाठी जो काही प्रकार सुरू आहेत, तो अजिबात विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही. घरी बसून आॅनलाईन परीक्षा घेणे वा देणे हा एक प्रकारे सामुहिक नक्कल (कॉपी) करण्याला उत्तेजन देण्यासारखा असेल. आॅनलाईन परीक्षा देताना विद्यार्थी गूगलचा वापर करून उत्तरे देतात, असा अनुभव आहे. दोन तासांची उत्तरपत्रिका अर्ध्या तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण केली जाते, यात त्यांच्या आकलनशक्तीचा वा बुद्धीचा वापर कसा होणार? अशा परीक्षाला आणि त्यातून मिळणाºया प्रमाणपत्राला भविष्यकाळात काय किंमत असेल हाही एक चिंतेचा विषय आहे. 


अशा आंदोलनात आपला पाल्य सहभागी झाला आणि त्याच्यावर पोलिस प्रकरणे वा गुन्हे दाखल झाल्यास (अल्पवयीन म्हणून का होईना) तर त्याचे शैक्षणिकच काय, सार्वजनिक आयुष्य सुद्धा उद्धवस्त होईल. शिक्षण विभाग शक्यतोवर असे काही होऊ करणार नाही; परंतु जमावात (अशा झुंडीतील परिणाम भयंकर असतात.) दुखापत झाली अथवा कोरोना संसर्ग झाल्यास परीक्षापूर्वी दवाखान्यात उपचार घेत पडावे लागेल. मग शैक्षणिक वर्ष, पैसा आणि वेळ वाया जाईल़ त्यामुळे यापासून सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे.






देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील पाच वर्षांपासून देशभरातील विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम आयोजित करतात. परीक्षासंबंधी ताणतणाव दूर करण्याच्या आणि त्यांना एक पालक म्हणून मार्गदर्शन करण्याचा त्यांचा उद्देश असतो. यात नागपुरातील किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे? याचेही आत्मपरीक्षण, चिंतन होणे गरजेचे आहे.


राज्याची उपराजधानी नागपूर शहरात आयआयएम, ट्रीपल आयआयटी, लॉ युनिव्हर्सिटी, एम्स अशा प्रसिद्ध शिक्षण संस्था आहेत़ सोबतीला व्यवस्थापन क्षेत्रातील, अभियांत्रिकी, वैद्यकीय, आयटीआय, तंत्रनिकेतन अशा किती अभ्यासक्रमांच्या संस्था आहेत़ त्यांचा उपयोग कोण घेणार? त्यातील प्रवेशासाठी जोरदार यश मिळवण्यापेक्षा कोणते झेंगट या विद्यार्थ्यांनी आपल्या मागे लावून घेण्याचा निर्णय घेतला, हे समजण्या पलिकडे आहे. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अनेक शिक्षण-प्रशिक्षण संस्था नागपुरात आहे़ कोण घेणार त्याचा उपयोग? देशभरातील विद्यार्थी शेकडो किलोमीटर अंतरावरील विद्यार्थी आपल्या घराला, कुटुंबाला दूर ठेवत याठिकाणी शिकावयास येतो आणि आपला पाल्य हातात दगड घेऊन आपलाच सखासोयरा, भाऊबहिण, मित्र, नातेवाईकाला सुरक्षित शाळेत पोहोचवणाºया बसवर दगडफेक करतो, यात चुकला तो पालकच आणि हरला तो पालकच!


संजय मुंदलकर

Thursday, 23 December 2021

देव्हाºयातली भक्ती ‘बाबां’च्या ताब्यात

हळूहळू गावातल्या भक्तीने कूस फेरली़ देव्हाºयाचे रूप पालटू लागले़ शेगावीच्या राणाचे,शिर्डीच्या साईबाबांचे छायाचित्र भिंतीवर लटकले़ देवाच्या जागी भलत्याच ‘बाबां’नी आक्रमण केले़ भक्तीची,श्रद्धेची जागा ‘अध्यात्म’च्या नव्या क्रांतीने घेतली़ देव्हाºयापुढे ‘नत’ होण्यासाठी झुकलेले मस्तक आता तासभºयासाठी बाबांपुढे झुकू लागले़ गळ्यासह आता मनगटाभोवती माळा गुरफटल्या जावू लागल्या़ 


गावात राबता शेतकºयांचाच असायचा! गाव आणि शेती असंच समीकरण बनलं होतं़ नोकरदार वर्ग फारच कमी होता़ असायचे ते मास्तर, चपराशी, कोतवाल, तलाठी असे काही महत्त्वाचे नोकरदार असे़ तरीही शेतकºयांचा आवाका रग्गड होता़ शेतीच्या कामातून थोडी फुरसत मिळाली की तो सण,उत्सवात रमवून घेत असे़ गावात किंवा पंचक्रोशीत यात्रा,शंकरपट,दंडार,गंगासागर असे कार्यक्रम असले की कामातून सवड काढत आपल्या कुटुंबीयांसह सहभागी होत़

याशिवाय गावात प्रवचन, कीर्तन, खंजरी भजन, अवधुती भजन,भारूड,ज्ञानेश्वरी  पारायण, काकडा, अखंड रामायण आदी कार्यक्रम होत़ यावेळी गोपालकाला आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असे़ थंडीत कुडकुडत आंघोळ करीत  पहाटे पहाटे काकड्याला जाण्यात मोठी मजा येत असे़ अगदी चार वर्षांचा बालकही त्यासाठी तयार असे़ 

गावात पंगत होत़  कधीकधी खिचडा करण्यात येई़त्यासाठी गावातून रोख रक्कम, धान्य अशा स्वरूपात वर्गणी स्वीकारण्यात येत असे़ गावकरी तनमनधनाने मदत करीत़ गावाशिवाय परिसरातील कित्येक लोक आपल्या घरातील कार्य समजून कार्यक्रमात सहभागी होत़ गावात एकजूट होती़ तसेच, संत गाडगेबाबा, वंदनीय तुकडोजी महाराज, लहानुजी महाराज यांची जयंती आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम होई़ पालखीतून मिरवणूक काढण्यात येत़  त्यानिमित्ताने ग्रामसफाई होत़ महिला, पुरुष, युवक, युवती मोठ्या उत्साहाने श्रमदान करीत़ 

काळ बदलला, गावात गाड्या धावू लागल्या, दुचाकी वाढल्या, शहरातले गुटखे गावात आले़ गावातली पोरं बाहेरगावी शाळेत पळायला लागली़ नवी लफडी तयार झाली़ बाहेरची गावात पोहोचली़ हळूहळू गावातली भक्तीने कूस फेरली़ देव्हाºयाचे रूप पालटू लागले़ शेगावीच्या राणाचे,शिर्डीच्या साईबाबांचे छायाचित्र भिंतीवर लटकले़ देवाच्या जागी भलत्याच बेगड्या‘बाबां’नी चाल केली़ भक्तीची,श्रद्धेची जागा ‘अध्यात्म’च्या नव्या क्रांतीने घेतली़ देव्हाºयापुढे ‘नत’ होण्यासाठी झुकलेले मस्तक आता तासभºयासाठी बाबांपुढे झुकू लागले़ गळ्यासह आता मनगटाभोवती माळा गुरफटल्या जावू लागल्या़ गावात आश्रम बांधण्यावर चर्चा होवू लागली़ सार्वजनिक हिताच्या कामासाठी खिश्यात हात घालण्यास ‘काकूं’ करणारे आता अघळपघळ पैसा मोजू लागले़ खरं तर हा समाजाविरुद्ध मोठा कट होता़

दुसरे संकट म्हणजे आता शहरातल्या त्यांच्या ‘एजंटां’ नी खेड्यापाड्यांत आपले हातपाय पसरविणे सुरू केले आहे़ त्यामुळे ह्या नव्या महा‘राजां’नी गावात धुमाकूळ घातला असून त्यांचे कार्यकर्ते अत्यंत नियोजितपणे आपापले काम करीत आहेत़ गावातील विठ्ठल,राम आणि हनुमान मंदिरातील भजनकºयांचा गोतावळा आता दुसरीकडेच वळताहेत़ आता तर काहीशा मोठ्या गावात अनेक बुवांनी आपले बस्तान ठोकले आहे़भाविक मंडळी महाराजांच्या, बुबांच्या विविध गटात विभागली आहेत़ काही वर्षांपूर्वी खेड्याखेड्यात करणी, बुवाबाजीचा मोठा जोर होता़ त्यामुळे मांत्रिकांची चांदी होती़ पाणी वा लिंबू भारून देणे,भानामती, लावडीन असाही प्रकार होता़ संपूर्ण गावाची ‘बांधणूक ’ करण्यासारखे प्रकार घडून येत़ त्यासाठी गावकरी वर्गणी करीत़ गावदैवतांची आस्थेने पूजाअर्चा करण्यात येत असे़ या सर्व प्रकारात अंधश्रद्धेचा गंध असला तरी कुणाचा विरोध होत नव्हता़ कारण त्यात भावना, श्रद्धा होती़ त्यानंतर मात्र महाराज, बुवांनी आक्रमण केले़ या वर्गांचा राखणदार होता खेड्यातील शिकलेला वर्ग़ सुशिक्षित माणूस पुढे असल्याने खेड्यातील माणसाने त्याच्यावर विश्वास ठेवला़ परिस्थितीनुसार नव्या संक्रमणाची चाहूल लागल्याने सामान्य व्यक्तीनेही त्यावर विश्वास ठेवला़आज या ‘सत्संगा’ला पैशांसह हजारो लोक उपस्थित राहत आहे़आणि यातील बुवा, महाराज काजू, मनुक्याचा बोकणा भरीत तृप्तीची ढेकर देत या गावाहून त्या गावी लोळण घेत आहेत़ महाप्रसादाच्या नावाखाली पैसा आणि धान्य गोळा होत आहे़ दुसºयाच्या पोटाची सोय करीत त्यावरील ‘साय’ मात्र आपल्या घशात कशी उतरवता येईल, यातच विचारमग्न आहे़ यात दोष कुणाला त्यांच्या लुटारू चलाखीला की लोकांच्या भोळ्या आणि भ्रामक कल्पनांना? शेवटी प्रश्न कायमच राहणार आहे़ बदलत्या दिवसांबरोबर आपल्या गावदैवतांना न विसरता परंपरेने चालत आलेल्या श्रद्धेला मात्र विसरू नये, इतकंच!                                                                                                                                                                                                                                                                                                                                © संजय मुंदलकर

Wednesday, 22 September 2021

घरावरची कौलं गेलीत कुठं ?

 कौलांना बरेच आयुष्य असायचं़ पावसाने कितीही ‘ओतणे’ चालू ठेवले तरी त्यातून एक थेंब पडत त नसे़ झडीच्या दिवसांत मात्र कवेलू ओलेगच्च व्हायचे़ मग त्यातून पाणी थेंबथेंब ठिबकायचे़ गावातील गरीबगुद्या माणसाचं घर हे निसर्गाची देणगीच असायची़ पºहाट्या, तुराट्या, बाभळीच्या नाहीतर कडुलिंबाच्या डिया हे सर्व फुकटातच मिळायचं़  फक्त हातात मेहनत हवी़


गावातली घर चंद्रमौळी असतात़ मागे पुढे अंगण़ अंगणात एका कोपºयात वृंदावऩ त्यात तुळशी माय़ कधी कधी भगवान शंकराची पिंड, शंखही विराजमान असतो़ शक्य असल्यास त्याच ठिकाणी विहीरही असते़ मागील बाजूस हीच स्थिती़ सकाळी पूजा करताना तुळशीला पाणी वाहतात, अगरबत्ती लावतात, तर सायंकाळी तिच्यापुढे दिवा लावतात़ अनेक घरातील आजीआजोबा यापैकी कुणी एक सायंकाळी नातवांसोबत शुभंकरोती म्हणतात़ यावेळी ते आपल्या पिढीतील संस्काराचा ठेवा त्यांच्या हवाली करीत असतात़

file photo

सधन कास्तकारांची घरे बैठी, मातीच्या भिंतीची, धाब्याची असत़ काहींची सिमेंटचीही असे़ त्यावर बंगलोरी कवेलू वा लोखंडी टिनाची पत्रे वापरण्यात येई़ सिमेंटच्या टिना महाग असल्याने त्यांचा वापर होत नसे़  प्रशस्त जागा, बैठकीची खोली वेगळी, स्वतंत्र स्वयंपाकघर, झोपण्याच्या खोल्या वेगळ्या,सामानसुमानाच्या अलग तर शेतमाल ठेवण्यासाठी वेगवेगळ्या खोल्या असत़ गरीब किंवा शेतमजुरांची घरे ‘कुडा’ची असत़ पुढची ‘सपरी’ आणि मागे स्वयंपाकघर अशी रचना असे़ पºहाटी, तुरट्यांंना ‘डियां’च्या मदतीने एका खोल पट्टीत रोवून त्यांना ‘कांबटी’ने घट्ट बांधण्यात येई़ त्यानंतर पांढºया मातीचे लिंपण देण्यात येत़ अशारितीने तो कुड तयार होत असे़ वरील बाजूला जुने-नवे बांबू टाकून त्यावर  तुराट्या आच्छादण्यात येई़ मग त्यावर कवेलू ‘शाकारली’ जात़ गावातली काही व्यक्ती अशी कौलं शाकाराण्यात वस्ताद असतात़ एकेका दिवशी ते चार-पाच घरे हातावेगळी करतात़ रोहिणीच्या सरी पडल्या की त्यांचे भाव वधरतात़ आमच्या गावातील नामदेव तेली, तुक्या वाघ, विठ्या, पुरुषा ही मंडळी कौलाचं घर शाकारण्यात तरबेज होती़ गावातील पूर्ण घरांचा जणू ठेका त्यांच्याचकडे असायचा़ इकडे शेतीची कामे आणि घर शाकारण्याची वेळ एकाच वेळी येई़

त्यापूर्वी उन्हाळाभर आमच्या गावातील देवा कुंभार कौलांचा कारखाना होता़ बेंबळा नदीच्या काठावर तो आपल्या बायको-लेकरांसह कौल तयार करण्याच्या कामात गुंतून घेई़ गाळाची माती शोधणे,तिला बारीक करणे, गाळणे, भिजवणे, त्यानंतर तिला पायाने तुडविणे अशी कामे करावी लागत़ मग कुठे ती तयार होई़ त्याचे ते काम बघण्यासाठी आम्ही दोस्तमंडळी बेंबळेच्या काठावर जात असू़ भरदुपारी जेवण झाल्यानंतर डोक्यावर एखादा जुना शेला बांधून घरातील मोठ्यांचा  डोळा चुकवून आम्ही तिकडे धूम ठोकायचो़ मग दिवेलागण होईपर्यंत तिकडेच राहायचो़ 

उन्हाळाभर मेहनतीने कवेलू तयार केल्यानंतर गावकरी देवाचा माल तर घेऊन जात; पण बरेच जण त्याचे पैसे उधार ठेवी़ यातील काही नगदी पैसे देत़ काही आपले काम संपले की त्या कुंभाराचे तोंड पाहणे टाळत असे़ ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ असा त्यांचा धर्म असे़ मग दुसºया वर्षी मात्र देवा त्यांना आपल्या दारातही उभा करीत  नसे़ संपूर्ण गावकरी याच कौलांनी आपली घरे शाकारून घेत़ देवाच्या कौलांना बरेच आयुष्य असायचं़ पावसाने कितीही ‘ओतणे’ चालू ठेवले तरी त्यातून एक थेंब पडत नसे़ झडीच्या दिवसांत मात्र कवेलू ओलेगच्च  व्हायचे़ मग त्यातून पाणी थेंबथेंब ठिबकायचे़ गावातील गरीबगुद्या माणसाचं घर हे निसर्गाची देणगीच असायची़ पºहाट्या, तुराट्या, बाभळीच्या नाहीतर कडुलिंबाच्या डिया हे सर्व फुकटातच मिळायचं़  फक्त मेहनतीची गरज असायची़

दिवस बदलले़ गावकºयांनी आता कौलांना बाजूला सारलं़ आणि मंगलोरी किंवा बंगलोरी कौलांना वर चढवलं़ कुंभाराच्या कौलांना भाव मिळेनासा झाला़ इतर बलुत्यांसारखा तोही आपल्या कारागिरीला मुकला़


© संजय मुंदलकर


Saturday, 9 January 2021

गावातली मन नासत आहेत

‘गाव करी ते राव न करी’, असं म्हणतात़ कारण गावातलं खेटरही गावकºयांच्या मर्जीबिगर बाहेर जात नाही़ गावात एकोपा असतो़ एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची भावना असते़ दुसºयाची दु:ख वाटून घेण्यासाठी रात्री जागण्यात येतात़ मरणधरण, लग्न अशाप्रसंगी वाट्टेल ती मदत करण्याची तयारी असते़ गावाच्या एका टोकावरून आलेली हाक कानात साठवून घेत हातातली कामं सोडून मदतीला क्षणात हजर होण्याची ताकद केवळ गावकºयांतच असते़ आपला-परका, कपट, द्वेष, स्वार्थ, गर्व,अभिमान हा भेद तिथं नसतोच; पण सावधान गाव आता बदलतो आहे़

गावाच्या चारित्र्याला ‘डाग’ लावला तो राजकारणाने!  फार पूर्वी गाव हे स्वयंशासित, स्वयंसंचालित अशी संस्था होती़ गाव मस्त होतं़ स्वविकास साधत होतं़ बाह्यहस्तक्षेप तिथं होत नव्हता़ गावकरीही ते सहन करीत नव्हते़ मात्र, जिल्हा पातळीवरील राजकारणाने बोट लावलं़ हे राजकारण गावात घुसलं़ राजकीय पक्षानेही आपापल्या चुली मांडल्या़ गावात ही तशी नवीच समस्या होती़ सुरुवातीला कुणीही शेकलं नाही़ मात्र, 

त्यांनी चार बूक शिकलेल्यांना हातीशी धरले़ त्यानंतर गट पडले़ तट पडले़ बाहेरच्या ‘पांढºया बगळ्यां’ची संख्या वाढली़ गावातलं खाद्य त्यांना आवडतं गेलं़ तेही त्यांच्या पचनी पडलं़ इथं प्रदूषण नव्हतं़ त्यामुळं आरोग्याला चांगलंच मानवलं़

गावाचा सरपंच बिनविरोध निवडून येण्याचं तंत्र गेलं़ निवडणूक रंगू लागली़ बाहेरच्या राजकारण्यांनी गावात दारू आणली, मटका आणला, जुगारही आणला़ पार्ट्याही आणल्या़ ग्रामपंचायत निवडणुकीत पैश्यांनी जोर  केला़ दारूच्या शिश्या, लुगडं,धोतरं हातोहात घरांघरात पोहोचतं झालं़ अशिक्षितांना आपल्या बाजूनं वळवलं़ मतांचं महत्त्व त्यांना कळू दिलं नाही़ ते त्यापासून अलगच राहावे,यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले़

निवडणुकीत बाहेरच्यांच्या गटाचा विजय झाला़ तो कसा हे सर्वांनाच ठाऊक होतं़ करणार काय?बुडाशीच कोलीत लावून घेतलं़ ते केव्हाही पेट घेणार हे त्यांना उमगून आलं़ झालं गावातली मन नासली़ शंकेखोर वातावरण तयार झालं़ जो-तो इतरांकडे संशयीवृत्तीने पाहू लागला़ बाहेरच्यांना मात्र हक्काचं घरच मिळालं़ राज्याच्या खुर्चीत बसण्यासाठी गावाचा चांगलाच उपयोग होणार होता़ 

पंचायत समिती़, जिल्हा परिषद आणि विधानसभा, लोकसभेतील खुर्चीसाठी त्यांनी सरपंचाला हाताशी धरलं़ काही वर्षांपासून सरपंचपद हे गावकºयांच्या भल्याशी झटत होतं़ आता मात्र स्वत:च घर कसं भरेलं,याचं चिंतन होताना दिसत आहे़ गावातल्या नाल्याचं, कोंडवाड्याचं, पाण्याच्या टाकीचं बांधकाम करताना त्यातील सीमेंट, रेती, विटा या सरपंचाच्या घशात ओतण्यात येत आहे़ जमाखर्च अगदी बरोबर दाखविण्यात येतो़ यात ग्रामसेवकही आपले हात ओले करून घेत आहे़ भरीसभर हा सरपंच जिल्ह्याच्या राजकारण्यांच्या दावणीला बांधला गेला आहे़ मुंबई, दिल्लीच्या वाºया करतो आहे़ कधीकाळी गावाच्या विकासासाठी समोरचे ताट बाजूला सारून धावून जाणारा हा पुढारी आता दुसºयाचा घास  पाहून लाळ घोळतो आहे़

आता ‘ते’ दलालही बनले

जिल्ह्याच्या राजकारणात भाव न मिळालेल्यांनी नवा फंडा तयार केला़ गावातील शेतजमिनी विकत घेण्यास सुरुवात केली़ बसमार्गावरील शेतीवर त्यांचा चांगलाच डोळा होता़ महत्त्वाच्या मार्गावरील गावात त्यांनी हातपाय पसरविणे सुरू केले़ गावातील काही ऐतखाऊ आणि आळशी शेतकºयांनी त्यांच्या इच्छेला खतपाणी दिले़ आता गावात नवीनच वर्ग जन्माला आला़ स्वत:ला ते आता ‘लँड डेव्हलपर’ किंवा ‘बिल्डर’ असे उपनाव देत गेले़ मात्र, ते ‘भू माफिया’ ठरले़ काळ्या आईचा बाजार मांडणारे दलाल ठरले़ गरीब शेतकºयांच्या शेतजमिनी घेण्यासाठी त्यांनी खास माणसे तयार केली़ पिकाचे उत्पादन कसे कमी होते, ती परवडत का नाही,याबाबत ते पुराव्यानिशी ‘मार्गदर्शन’करू लागले़ ही कामे त्यांनी गावातील माणसांवरच सोपविली़ पैश्यांची चटक लावून देण्यात ते तरबेज होते़ वेळप्रसंगी धमकाविण्याचेही प्रकार घडले़ एखाद्याने जमीन देण्यास नकार दिल्यास त्याच्या शेजारची मिळवू लागले़ त्यामुळे पहिला त्रस्त होत आपली शेतजमीन संबंधितांना विकू लागला़ गावातील जमिनी ताब्यात घेण्याचा जणू चंगच त्यांनी बांधला आहे़ तालुकापातळीवरील गावात त्यांना सिमेंटची जंगले उभी करायची आहे़ शहरातील गुन्हेगारी गावातही पोसायची आहे़  जिवापाड जपलेली जमीन हडपण्यात येत आहे़ ही कीड आता गावोगावी लागली असून त्यापासून वेळीच सावध होणे गरजचे आहे़ 


© संजय इस्तारी मुंदलकर




















Saturday, 8 August 2020

हरवली झडीतली ‘घोंगशी’

 तीन ते चार दिवस पावसाची एकसारखी संततधार म्हणजे झड़ हा पाऊस मोठ्यानं कधीही कोसळत नाही़ मात्र, त्याची रिपरिप सुरू असते़ त्यामुळं शेतातली कामं बंद़ रस्त्यावर चिखलच चिखल! डोळ्याच्या कपारीतून शिवारभर पांढरं धुकंच धुक दिसून येते़ डवरणीची, निंदणीची सर्व काम ठप्प़ सगळा मजूरवर्ग घरीच असतो़ सुरुवातीला आरामदेह वाटणारी झड नंतर मात्र नकोशी वाटते़ ऐरवी कौलाकौलातून सकाळ, दुपारी निघणारा धूर सकाळपासून रात्री उशिरापर्यंंत पावसाच्या थेंबाथेंबाशी बिलगलेला असतो़ मजूर बायाबाप्ये गप्पाटप्पात रंगलेल्या दिसून येतात़ बिड्यांच्या धुराबरोबर गोष्टीचा फड रंगलेला असतो़ 




गावाच्या चौकातील एखाद्या हॉटेलमध्ये मैफल बसलेली असते़ कुणी भज्याची आर्डर दिलेली असते, तर कुणी चहाचा खर्च करणारा असतो़ एखादा म्हातारा जुन्या गोष्टीच्या पोतड्या उघडून दाखवितो़ तरणी पोरं त्याच्या गोष्टी कान टवकारून ऐकत असतात़ तो म्हातारा आपल्या हयातीमधील झडीच्या गोष्टी मोठ्या खुबीने सांगत ऐकणाºयांची उत्कंठा वाढवित असतो़ गावाला पुराचा वेढा, पाण्यातून वाहत गेलेले गुरंढोरं, बुडालेली पिकं, पुरातून वाहत जाणाºया व्यक्तीला कसे बाहेर काढले आदींचे वर्णन तो हातवाºयाच्या मदतीने किंवा उभे राहून, दंड थोपटून कथन करीत असतो़ त्या हॉटेलात पाय ठेवण्यास जागा कमी पडल्यास काहीजण ‘घोंगशी’ घेऊन उभे असतात़ ही ‘घोंगशी’ पोत्याची वरची एक बंद बाजू आत घालून तयार केलेली असते़ कुणी घोंगडी अंगावर घेऊन आलेला असतो़ 

काही शेतकरी दोघा तिघाच्या गटानं अंगावर ‘घोंगशी’ घेवून शिवारात गेलेली असतात़ संपूर्ण शिवार पांढºया तुषारी पावसात न्हाऊन निघालेलं असतं़ पºहाटीच्या, ज्वारीच्या ‘वई’त पाणीच पाणी भरलेलं असतं़ ते धुºयावरून पिकाच्या नुकसान-फायद्याचा अंदाज घेतात़ डवरणं किंवा निंदणाची काम किती दिवसांनंतर सुरू होतील, असा निशाणा लावत धुºयावरील गवतातून त्यांचा विळा भराभर चालत असतो़ मग डोक्यावरील ‘घोंगशी’वरच गवताचा भारा घेवून शेतातल्या पायवाटेतल्या चिखलातून त्यांचे पाय भराभर गावाकडे चालत निघतात़ एखाद्यावेळी पायात काटा रुतल्यास समोरच्याला हाक देत धुºयावर भारा ठेवत काटा काढण्यात येतो़ पायातून रगत निघाल्यानंतरही त्यांचे पाय गाव लगबगीने जवळ करीत असतात़ कारण न जाणो गावाशेजारच्या नाल्याला पूर आल्यास पंचाईत होण्याची शक्यता असते़

घरी आल्यावर गोठ्यातल्या ‘गोहानी’त थोडंथोडं गवत टाकण्यात येते़ पावसाची रिपरिप सुरू असल्यानं जनावरेही एकाच खुट्याला बांधलेली असतात़ शेणाचा सडा असतो़ मग घरधनी ओल्यावरची जनावरं कोरड्या जागेत बांधतो़ आता सांजवेळ झालेली असते़ चिल्टाईचा जोर वाढलेला असतो़ तोपर्यंत घरातल्या धुनी पुन्हा पेटलेली असते़ इकडं घरातलं एखादं पोट्टं दूध सरल्याचं सांगतो तेव्हा तो दुधाच्या खास बादलीत चर्चर् धारा काढत फक्कड चहा बनविण्यास बजावतो़ बाहेर रिपरिप सुरूच असत़े  शाळालाही बुट्टी असल्यानं पोरंसोरं लहानशी ‘घोंगशी’ अंगावर चढवून चिखलातून नाचत असतात़ अशावेळी घरासमोरून एखादा दोस्त ‘घोंगशी’पांघरून जात असल्यास त्याला हाक देत चहा पिण्याचा आग्रह केला जातो़ मग घराच्या ‘वसरी’त बैठक मारत चहा पित झडीच्या, पिकाच्या गोष्टी सुरू होतात़ सोबत तंबाखू नाहीतर बिड्या फुंकण्यात येतात़ तोपर्यंत घरातले कंदिल पेटलेले असतात़ बाहेर अंधारून आलेलं असतं़ रातकिड्यांच्या किरकिरीला सुरुवात होते़ चिल्टही कानाभोवती पिंगा घालतात़ मग एखादा म्हातारा धग पेटवून त्यावर कडुलिंबाचा पाला टाकतो़ त्यातील धुरानं चिलटं,डास पळतात, असा समज असतो़ रात्री जेवणावळीला एखादा घरधनी आपल्या बापाला, आईला, बायकोला, लेकरांना पिकांची    ‘कंडिशन’ सांगतो़ त्यावर सर्वांची मते घेतली जातात़ बाहेर थंडीने हुडहुडी चालविलेली असते़ मग ‘वसरी’त गोधड्या साथरल्या जातात़ मग गोष्टींची उतरण सुरू होते,तसा डोळा झाकत येतो़ झडीचा एक दिवस सरलेला असतो आणि ‘घोंगश्या’ दुसºया दिवसासाठी कोरड्या होण्यासाठी एखाद्या खुटीवर किंवा पºहाटी, तुºहाटीच्या कवट्यावर पहुडलेल्या असतात़

आता ‘झड’ गेलीय कुठं?

दिवस बदलले़ गावरानी जाऊन ‘हायब्रिड’ आलं तशी झडही लोप पावली़ आता झड दिसत नाही़ का कुणास माणसाला दुर्बुद्धी सुचली नि त्याने निर्सगावर मात करण्यास सुरुवात केली़ या सर्व प्रकारात स्वार्थ विजयी ठरला असला तरी त्याचे परिणाम आज दिसून येत आहे़ पावसाचे थेंब कमी झालेत़ आजच्या पिढीला ‘झड’ नावाची संकल्पना गावीही नाही़ पुस्तकातच तो शब्द वाचण्यात येतो़ त्या दिवसांतील धुरांची वलये गुंडाळून बसलीय़ शिवार आता पहिल्यासारखं भिजत नाही़ ‘घोंगशी’ची जागा आता छत्रीनं घेतली़.

Tuesday, 16 June 2020

पुस्तके विकून गाठली अभिनयनगरी


‘बॉलिवूड’मधील अनेक कलावंत दीर्घकाळपर्यंत चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतात. मग ते निवृत्त झाले असो वा दिवंगत़ नायक असो, सहनायक असो, नायिका असो वा खलनायक. भारतीय चित्रपटसृष्टीतील खलनायक म्हटले की, अभिनेता जीवन यांच्यापासून सुरुवात करता येईल़(कारण त्यांना ओळखणारी पिढी सध्या ८० वर्षांच्या आसपास असू शकते.) नंतरच्या काळात प्राण, अजित, अमरिश पुरी, प्रेम चोप्रा, अमजद खान, कादरखान, सदाशिव अमरापूरकर, मोहन जोशी अशी रांग लागते़ नव्या पिढीतील किरण कुमार, परेश रावल, गुलशन ग्रोवर, शक्ती कपूर आदींचा समावेश होतो. सध्याच्या घडीला मुकेश ऋषी, गोविंद नामदेव, आशिष विद्यार्थी, मुकेश तिवारी ही मंडळी आहेत. मित्रांनो, कलावंताची भूमिका कोणतीही असो, आपल्याला त्यांच्यातील अभिनय वारंवार खुणावत असतो. म्हणून तर मुगल ए आझममधील जितका अकबर, तितकाच सलीम आपल्याला आवडतो़ शोले चित्रपटातील जितके जय विरूचे चाहते असतो, तितका गब्बर पसंत असतो़ जातिवंत रसिक, तोच...जो केवळ कलाकारातील अभिनय चाखतो!
असाच एक खलनायक पाहूयात़़़अजित! होय अजितच...अभिनयाचा गर्भश्रीमंत खलनायक़ आपण खलनायक अजित अर्थात लॉयन यांच्याबदद्ल बोलूयात. शेरवानी किंवा बंद गळ्याचा कोट किंवा थ्री पीस सूट, गळ्यात मोत्यांच्या माळा, टोकदार मिशी आणि बोटात सिगार वा पेटती पाईप. हे दृश्य केवळ अजित यांनाच शोभत होते. अधिकांश वेळा ते श्रीमंत व्यापारी किंवा समाजसेवकाच्या रुपात समोर येऊन पडद्यावर काळेधंदे करण्यात रममाण असल्याचे रसिकांनी पाहिले आहे. त्यांचे खरे नाव हमीद अली खान असे होते. पडद्यावर त्यांनी ‘अजित’ असे नाव धारण केले. ( हे नाव त्यांना ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांचे वडिल नानाभाई भट्ट यांनी दिले होते, असे सांगण्यात येते.) पीटर, रॉबर्ट, मायकेल सारख्या ख्रिश्चन व्यक्तिरेखा साकारणाºया अजित यांनी पडद्यावर स्मगलरची खलनायक म्हणूनच ओळख निर्माण केली. त्यांची प्रतिमा मवाळपणाने बोलणारी; पण विध्वंसक खलनायकाची होती. सन १९४० च्या सुरुवातीला २२ व्या वर्षी त्यांना मुंबईत हीरो बनण्याची हुक्की आली. अभ्यासाची पुस्तके विकून जिवाची मुंबई नव्हे, अभिनयासाठी मुंबई गाठली. (अजित यांचा जन्म हैदराबादमधील गोलकोंडा येथे २७ जानेवारी १९२२ रोजी झाला होता. वारंगलमध्ये शिक्षण घेतले.) मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर ते हीरोही बनले. नानाभाई भट्ट यांनी त्यांना हीरो म्हणून पडद्यावर उतरवले. नास्तिक, बडा भाई, मिलनस बारादरी, ढोलक यात नायक म्हणून अभिनय साकारला, तर मुगल-ए-आझममध्ये सेकंड लीडवर समाधान मानले.
अजित यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पृथ्वीराज कपूर यांच्यापासून अगदी अमिताभ बच्चन यांच्यासह अजय देवगण यांच्याबरोबरही काम केले आहे. त्यावेळी नूतन आणि नर्गिस वगळून सर्व अभिनेत्रींसोबत त्यांनी अभिनय साकारला. सहायक अभिनेता (साईड हीरो) म्हणून त्यांनी ‘नया दौर’ आणि ‘मुगल-ए-आजम’मध्ये दिलीप कुमारसोबत काम केले. आपण अभिनयात कमी नाही, हे त्यांनी या दोन चित्रपटांतून दाखवून दिले; परंतु नंतरच्या काळात त्यांना केवळ बी ग्रेड चित्रपटच मिळत राहिली. राजेंद्र कुमार यांच्या सल्ल्यावरून त्यांनी ‘सूरज’ चित्रपटापासून खलनायक म्हणून नवीन ‘ईनिंग’ सुरू केली. दुसºयाच वर्षी आलेल्या ‘कालीचरण’नंतर त्यांना लॉयन अशी उपाधी मिळाली. यापूर्वी ६० च्या दशकात प्राण यांनी मैदान गाजवले होते. यानंतर अजित यांनी १९७० आणि ८०चे दशक गाजवण्यास सुरुवात केली. हा खलनायक प्रामुख्याने श्रीमंती लोळत पडलेला दिसून आला. कालीचरणमधील ‘दीनदयाल’ असाच काहीसा होता. ‘सारा शहर मुझे लॉयन के नाम से जानता है’, हा संवाद मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला. या खलनायकाला एक पर्सनल असिस्टंट सुद्धा असल्याचे दिसून येते़ ‘मोना डार्लिंग’ असे तिचे नाव़ अजित यांनी या भूमिकेत इतका जीव ओतला की चाहते ‘लॉयन’सोबत मोनाचीही आठवण काढत असे.

व्हिस्कीची आॅफर

कोणत्याही चित्रपटात खलनायकाने केवळ मारच खावा, असे अपेक्षित असते़ अजित मात्र त्याला अपवाद आहे. ते नायकाला चक्क व्हिस्की आॅफर करतात. आठवा जंजीर... या चित्रपटात एक संवाद आहे़ खलनायक सेठ धर्मदयाल तेजा म्हणतो, ‘आओ विजय, बैठो और हमारे साथ एक स्कॉच पियो. हम तुम्हें खा थोडेही जाएंगे. वैसे भी हम व्हेजिटेरियन है’. या चित्रपटात समोर त्यावेळचा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन होते. जंजीर चित्रपटात अजित यांनी शब्दांमध्ये पॉझ घेत बोलण्याचा प्रयोग केल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. (याबाबत असे सांगण्यात येते की अजित यांनी हैदराबादेतील एक व्यक्ती अशाचप्रकारे संवाद साधत असल्याचा अनुभव घेतला होता.) पुढील काळात हीच त्यांची ओळख बनली़ खलनायक सुद्धा मृदुभाषी आणि शालिन असू शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. याचा प्रत्यय जुगनू, वारँट, चरस, यादों की बारात, कहानी किस्मत की, संग्राम अशा अनेक चित्रपटांतून पाहावयास मिळतो.

गीतेचे ज्ञान 

कोणत्याही चित्रपटात हीरो (नायक) हाच खलनायकाला संस्कृती आणि नैतिकेतेचे धडे देत असतो. (चित्रपटाच्या लेखकाने तशीच काहीशी तरतूद केलेली असते.) अजित यांचा मामला मात्र उलटा आहे. ते स्वत: हीरोला ज्ञान देत असतात. हे म्हणतात, अपनी उम्र से बढ़कर बातें नहीं करते. आशीर्वाद तो बड़े देते हैं. हम तो सिर्फ राय देते हैं़ अच्छा खरीदार हमेशा सौदा करने से पहले दुसरों की किंमत का अंदाजा लगाता है. अजितमधल्या खलनायकाला हेही माहिती आहे की गीतेची रचना कशी झाली. त्यांचा एक संवाद असा आहे, ‘तारीख इस बात की गवाही देती है कि महाभारत की कहानियाँ कभी गुलाबजल से नहीं लिखी गयी. ये हमेशा गरम खून से लिखी जाती है.
मित्रांनो, अजित यांना आपले संवाद बोलण्याची एक विशिष्ट ढब गवसली होती. ती त्यांच्या आवाजाला ‘परफेक्ट’ बसली. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी सकारात्मक भूमिका साकारल्या. मुगल-ए-आजममधील अजित यांना विसरणे अशक्य आहे. त्यांच्या आवाजात एक ‘वजन’ होते, ज्याने त्यांना मृत्यूपर्यंत म्हणजे २३ आँक्टोबर १९९८ पर्यंत ‘श्रीमंत खलनायक’ म्हणून कायम ठेवले.

काही प्रसिद्ध संवाद

* कुत्ता जब पागल हो जाता है तो उसे गोली मार देते हैं (जंजीर)
* सारा शहर मुझे लॉयन के नाम से जानता है (कालीचरण)
* जिस तरह कुछ आदमियों की कमजोरी बेईमानी होती है, उसी तरह कुछ आदमियों की कमजोरी ईमानदारी होती है (जंजीर)
* जिंदगी सिर्फ दो पांवों से भागती है और मौत हजारों हाथों से उसका रास्ता रोकती है (आजाद)
* मेरा जिस्म जरूर जख्मी है, लेकिन मेरी हिम्मत जख्मी नहीं (मुगल-ए-आजम)
* शाकाल जब बाजी खेलता है तो जितने पत्ते उसके हाथ में होते हैं, उतने ही उसकी आस्तीन में होते हैं (यादों की बारात)

©  संजय इस्तारी मुंदलकर

Sunday, 14 June 2020

नमुने



गाव म्हटलं गावात अनेक नमुने असतात़ आता हे काय ‘बेण’ असं विचारालं, तर बरं होणार नाही़ ‘बेणं’ या शब्दाचा अर्थच जात असा़ ‘माती तशी चूल’ अशी म्हण तर विचारात घेतली तर ‘गाव तशा जाती’ राहणार आणि त्यातील ह्या ‘बेणी’ सुद्धा! गाव हे अगदी दहा-वीस घरांपासून तिकडे हजारांच्या लोकसंख्येत सांगता येईल़ लहान परिसर असल्याने प्रत्येकांच्या ओळखीशी आपण जुळलेले असतो़ त्यांचा स्वभाव माहिती असतो़ त्यांच्या प्रत्येक गोष्टीशी जुळवून घेतात़
माझा जन्म गावातलाच़ गावातल्या मातीशी नाळ जुळलेला मी माणूस़ प्राथमिक शाळेत असेपर्यंत मी अनेकांची घरे बघितली नव्हती वा त्यांची माहिती नव्हती़ मात्र,वय वाढले गेले तशी गावाशी ओळख झाली़ ‘माणसां’शी ओळख झाली तशी त्यांच्या स्वभावाच्या विविध कंगोºयाशीही ओळख झाली़ अनुभव येत गेले़ तशी स्वभावावर लिंपण होत गेली़
माझ्या गावात ‘खंड्या’ नावाचा व्यक्ती होता़ आता तो हयात नाही़ बºयाच वर्षांपूर्वी तो देवाघरी गेला़ त्यावेळी अंदाजे माझं वय चौदा-पंधरा वर्षे असेल़ ह्या खंड्याचं मूळ नाव मला माहिती नाही़ बहुधा तो लहान भावासोबत राहात असावा़ तर हा खंड्या पाहायला काळा होता़ त्याचा वरचा ओठ दोन भागात तुटलेला होता़ तसा तो पाहायला वाईट नव्हता; पण काळ्या रंगावर ओठाची दोन ‘खांड’ झाल्याने तो भयानक दिसायचा़ कदाचित याच कारणामुळं त्याचं लग्न झालेलं नसावं़ लहान मुलं त्याला घाबरायची़ शेतातील कामे करून आपले आणि भावाच्या पोटापाण्याची व्यवस्था करायचा़ माझ्या घराजवळ देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येत़ विसर्जनाच्या दिवशी कुणी वाघाचं सोंग घेई, कुणी घोडा बनत, कुणी जिराफाचं सोंग घेत़ यात खंड्या वाघाचं रुप साकारत असे़ मुळातच तो रंगानं काळा होता़ त्यामुळं त्याच्या अंगावर पिवळे पट्टे उठून दिसतं़ तर हा खंड्या वाघाचा नाच करण्यात निपुण होता़ कधीही आणि केव्हाही तो तसे नृत्य करण्यास तयार असे़ देवी विसर्जनात खंड्याशिवाय कुणीही वाघाचे सोंग घेत नव्हते़ आणि कुणी तसा विचार केलेलाही त्याला खपत नसे़ त्याच्या या स्वभावाचा कुणीही फायदा घेत असे़ एका विसर्जनाच्या दिवशी अंगात ताप असूनही त्याने आपले काम चोख बजावले होते़ ‘देवी मला काहीही होऊ देणार नाही’, असे तो म्हणत असे़ आणि खरोखर त्याचा ताप दुसºया दिवशी पार पळाला़ एकदा तो विहिरीवर पाणी भरण्यास आला़ काही टारगट पोट्यांना हुक्की आली़ ते सर्वजण खंड्याजवळ आले आणि त्यांनी वाघाचा नाच सादर करण्यास सांगितलं़ झालं हा खंड्यानं बादली-दोन बाजूला ठेवला आणि तिथंच ‘डजगनं डजगनं’सुरू केलं़
काशिनाथ लांडगे हे गावातील आणखी दुसरं ‘बेणं’ होतं़ आडनांव लांडगे असलं तरी तो बघायला ‘वाघा’सारखाचं होता़ साडेसहा फूट उंची, धिप्पाड अंगकाठी, काळाकुट्ट रंग, चेहºयावर माताच्या वणा,आवाजातही मोठी जरब असं हे व्यक्तिमत्त्व होतं़ तर या काशिनाथबुवाच्या बायकोपोराबद्दल अनेकांनी वेगवेगळं ऐकलं होतं़ तो एकटाच राहत असे़ कदाचित त्यांच्या कामचुकारवृत्तीने,आळशीपणामुळे बायको त्याला सोडून गेली असावी़ पोटापाण्यासाठी तो फारसा काम करताना दिसत नसे़ त्याचा दिनक्रम ठरलेला असे़ दुसरं काही नाही केलं तरी त्याची सकाळची आंघोळ कधी चुकली नाही़ तो कधी आजारी पडलेला, असं मीच काय? कुणीही ऐकलेलं नाही़ कधी कधीच तो काम करायचा, असं म्हटलं तर हसायला नको़ कारण तो कामाला जाताना क्वचितच दिसायचा़ मात्र, रामकृष्ण मामाच्या कामठ्यात बसलेला असायचा आणि त्याच्याशी चकाट्या पिटायचा़ हा कामठा एसटी स्टँडला लागूनच होता़ त्यामुळे गप्पांना विषयांची वाणवा नसे़ तर हा काशिनाथ कुणावरही विनाकारण डाफरत असे़ त्याचं कुणाशी कधी वाजेल याचा भरवसा नसे़ कधीकधी तो गावखाºयाची रखवालीचं काम करायचा; पण रस्त्यावरूनच आवाज करीत त्यामुळं कमीत कमी डुकरं तरी पळून जायची़ पिकात मात्र शिरायचा नाही़
आमच्या गावात भागवताचं सप्ताहाभर दररोज जेवणाचा कार्यक्रम होत असे़ कुठे वरणभात,पोळीचं तर कुठे खिचडी,कढीचं जेवण राहायचं़ हा बुवा एकटा असल्याने त्याला आमंत्रण असायचंच; पणह्या काशिनाथबुवाचा आहार खूप होता़ तो किती खायचा, ह्याचा हिशोब लावताना जेवण वाढणारे थकून जातं़ एक पंगत संपली तरी त्याचं जेवण संपत नसे़ खिचडी तरी तो पायली-दोन पायल्यांची खात असेलच़ अनेकांनी त्यांच्या आहाराच्या अंदाज घेण्याचा प्रयत्न केला;परंतु ते कुणालाही साधलं नाही़
तसे गावात ‘बेणं’ खूप होते आणि आहेतही़ मात्र, आता खूप फरक पडला आहे़ गावातले दिवस बदलत आहेत, कदाचित म्हणून असावेत़ आबा, पक्या, ईठ्या, सुध्या असे अनेक भारी भारी ‘कॅरेक्टर्स’ आहेत़


© संजय इस्तारी मुंदलकर